JMM on BJP। देशात लोकसभा निवडणूक आता तोंडावर आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इतर पक्षातील नेते आता भाजपमध्ये प्रवेश करण्यावर भर देताना दिसतायत. या नेत्यांमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचारी नेते असल्याचा आरोप करण्यात येतोय. याच मुद्द्यावरून आता झारखंड मुक्ती मोर्चाने भाजपाबाबत मोठा दावा केला आहे. गेल्या दहा वर्षांत देशभरातील इतर पक्षांमधल्या तब्बल ७४० खासदार-आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आलाय.
झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले. त्यांनी “२०१४ ते २०२४ या काळात देशामध्ये अनेक अजब गोष्टी घडल्याचं दिसून आलं आहे. अगदी काय खावं, परिधान करावं, अभ्यास करावा, अगदी काय ऐकावं यासंदर्भातही सूचना, आदेश देण्यात आलेत. सत्ताधाऱ्यांच्यामते विरोधात असणारे सगळे भ्रष्ट आहेत. भाजपामध्ये असणारे सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. त्यांनी हेही म्हटलंय की जे सरकारच्या धोरणांना विरोध करतात, ते राष्ट्रविरोधी आहेत”, असा आरोप सुप्रियो भट्टाचार्य यांनी केला.
दहा वर्षांत तब्बल ‘एवढे’ पक्षप्रवेश JMM on BJP।
सुप्रियो भट्टाचार्य यांनी केलेल्या दाव्यानुसार गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षांमधून एकूण ७४० आमदार-खासदारांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. “गेल्या १० वर्षांत ७४० खासदार-आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यातले बहुतांश सदस्य हे काँग्रेसमधले होते. विशेष म्हणजे या सगळ्यांवर भाजपानं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता हेच लोक त्यांचे आवडते झाले आहेत”, अशा शब्दांत सुप्रियो भट्टाचार्य यांनी भाजपावर निशाणा साधला.
“माय वे ऑर हाय वे” JMM on BJP।
तसेच भट्टाचार्य यांनी भारतीय जनता पक्षानं अहंकारी वृत्तीचं धोरण राबवायला सुरुवात केल्याचा आरोप केला. “माय वे ऑर हाय वे असं धोरण भाजपानं राबवलं आहे. झारखंड हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी,”आदिवासींचा सन्मान ही त्यांच्यासाठी प्राधान्याची बाब आहे. पण त्यांना आदिवासी मुख्यमंत्री मात्र नको आहे. जर आदिवासी मुख्यमंत्री झालाच, तर त्याची तुरुंगात रवानगी केली जाईल”, अशी टीका भट्टाचार्य यांनी भाजपावर केली.