पुणे – “पानशेत धरणाच्या पाणी सोडण्याच्या कॉंड्युइटमधून पाणी बाहेर झिरपून कॉंडइटिसाठी असलेल्या चरांमध्ये पडू लागले आणि त्या चराच्या बाजूची माती पाण्याबरोबर वाहून जाऊ लागली. त्यामुळे कॉंड्युइटच्या कमानीवरती पडणाऱ्या वजनात वाढ झाली’, असा सिद्धांत इन्स्टिटुट ऑफ इंजिनिअर्स मुंबई शाखेचे सभासद श्री. एस. बी. जोशी यांनी मांडला आहे. या संबंधी कमिशनचे तांत्रिक सल्लागार श्री. सी. एल. हांडा व श्री. एम. सी. मित्रा या दोघांनी आज श्री. जोशी यांना बरेच प्रश्न विचारले.
श्री. जोशी यांचे म्हणणे होते की, कॉंड्युइटच्या कमानीवरती उपरोक्त प्रमेयाप्रमाणे फार दाब वाढला आणि तो सहन न झाल्यामुळे धरणाच्या मध्यरेषेपाशी कमान अखेरीस कोसळली. कमानीवरती वजन कशा रीतीने पडलेत्याचे गणित करताना काही गृहीत गोष्टी मानाव्या लागल्या. त्या गृहीत कृत्यांच्या वस्तुनिष्ठतेबद्दल दोनही तांत्रिक सल्लागारांनी श्री. जोशी यांना प्रश्न विचारले. श्री. जोशी यांनी एकंदर धरणस्फोटाच्या कारणांचे केलेले विश्लेषण हे सध्या सर्वमान्य असलेल्या एतद्विषयक “सिद्धांत व त्यांचा व्यवहारात वापर’ करण्याच्या पद्धतीच्या पार्श्वभूमीवर हे प्रश्न विचारले गेले. त्याचा रोख श्री. जोशी अंदाजिल्याइतके हे वजन जास्त का मानावे याची चिकित्सा करण्याचा होता.
माल्डा दंगलीची चक्रे भारतांतील पाक अधिकाऱ्यांनी फिरवली?
कलकत्ता – माल्डा जिल्ह्यात जातीय दंगली माजवण्यामागे भारतातील पाकच्या वकिलांतीतील दुय्यम कमिशनर व त्यांचे चिटणीस यांचा हात आहे, असा आरोप कॉंग्रेस पक्षीय खासदार श्रीमती रेणुका रे यांनी आज माल्डा भागात दौरा करून आल्यावर पत्रकारांजवळ बोलताना केला. श्रीमती रे पुढे म्हणाल्या, “”पाक सेक्रेटरीने दि. 5 ते 8 या काळात या भागात दौरा काढला होता व त्यावेळी त्यांनी इंग्लिश बझार वगैरे गावात जातील दंगलींना प्रोत्साहन दिले अशी माझी ठाम कल्पना झाली आहे.