मुंबई – राज्यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. नाना पटोले यांनी अधिवक्ता सतीश उके यांच्यामार्फत नागपूरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल केला.
पटोले यांची बाजू ऐकून न्यायालयाने केंद्रीय गृह विभागाच्या सचिव रश्मी शुक्ला, राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त सचिव, नागपूर आणि पुणे शहर पोलीस आयुक्त आणि पुणे गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी वैशाली चांदगुडे यांना समन्स बजावले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे.
शुक्ला यांच्यावर 2017-18 मध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यावेळच्या विरोधी पक्षनेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप आहे. फोन टॅपिंगसाठी त्यांनी राजकारण्यांची नावे बदलून प्रस्ताव मंजूर करून घेतल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.
नाना पटोले यांना अमजद खान नावाच्या ड्रग्ज तस्कराने नाव देत त्यांचा फोनही टॅप केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विधानसभेने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली. शुक्लाविरुद्ध पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये शुक्ला यांनी लोकप्रतिनिधींची स्वच्छ प्रतिमा डागाळल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात 2 एफआयआर नोंदवण्यात आले आहे. पहिला एफआयआर मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात, तर दुसरी तक्रार दक्षिण मुंबईतील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना फोन टॅपिंग झाल्याचा आरोप आहे. त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते.