पिंपरी – उद्योगनगरी म्हणून प्रचलित असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या उद्योगांना सध्या कोट्यवधीचे नुकसान सहन करावे लागत आहेत. एकीकडे महागलेला कच्चा माल तर दुसरीकडे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पर्यायी इंधनावर होणारा खर्च, वेळेत काम पूर्ण होत नसल्याने होणारे नुकसान यामुळे उद्योगनगरीला रोज सुमारे 50 कोटींचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात 13 हजार 500 लघु आणि सूक्ष्म उद्योग आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार खंडित झालेला वीज पुरवठा पाहता रोज सरासरी दोन तास काम ठप्प पडले आहे. तसेच कच्च्या मालाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. हे पाहता उद्योगांना रोज मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
करोनानंतर आर्थिक घडी पूर्वपदावर येत असतानाच खंडित वीज पुरवठ्याने उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने उत्पादन थांबत आहे. ठरवून दिलेल्या वेळेत कामे पूर्ण होत नाहीत. कामगारांना बसून पूर्ण पगार द्यावा लागत आहे. हा सगळा खर्च पाहता पिंपरी चिंचवड शहरातील लघुउद्योजकांना खंडित वीजपुरवठा तसेच इतर कारणांमुळे दररोज सुमारे 50 कोटींचे नुकसान होत आहे.
उद्योजकांनी सांगितले की, फिडरवरील विजेचा वाढता लोड, नादुरुस्त केबल लाइन, ऑइलची पातळी कमी असणे, खराब ट्रान्सफॉर्मर आदीसह विविध कारणांमुळे पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात वीजपुरवठा खंडित होत आहे. दिवसाकाठी सुमारे दोन तास ही समस्या निर्माण होत आहे.
पिंपरी चिंचवड मधील लघुउद्योजकांना दिवसाकाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आणखी आर्थिक नुकसान होत आहे. दिवसाला रोज या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
– संदीप बेलसरे,अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटना.