तहसीलदार डॉ. वाघमारे यांची माहिती : नऊ महिन्यांनंतर शेतकऱ्यांना दिलासा
राजगुरूनगर – खेड तालुक्यात गेल्या 1 ते 3 डिसेंबर 2021 मध्ये तीन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व थंडीने 8 गावातील 18 कुटुंबांची 128 जनावरे दगावली होती. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनातंर्गत आणि शासन नियमानुसार 5 लाख 18 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.
डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या अवकाळी पावसात शेती पिकाचे नुकसान झाले होते. याबरोबरच जनावरांचा मृत्यू झाला होता. राज्य शासनाने शेती व मृत जनावरांचे पंचमाने केले होते. राज्यसरकारने (दि. 12) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकांसाठी व मृत जनावरांच्या मृत्यूची नुकसानभरपाईबाबत आदेश काढला आहे. भरपाई रक्कम मंजूर केली आहे.
आठवडाभरात भरपाई निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर खेडसाठी महसूल विभागाला निधी प्राप्त होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना तलाठ्यामार्फत कळविण्यात येईल. निधी प्राप्त होताच आठवडाभरात भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार अवकाळी थडीने मृत जनावरानासाठी मिळणारी भरपाई ही एका कुंटुबातील तीन जनवरांसाठी भरपाई देण्यात येते.
दुधाळ गायी, म्हैस आदी जनावरांना 30 हजार, मेंढ्या, बकऱ्या, डुक्कर आदी प्रांण्यासाठी एका कुंटुबातील 30 प्राण्यांना प्रत्येकी तीन हजार तर बैल, घोडा, उंट आदी प्राण्यांसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये, वासरु, गाढव, शिंगरु, खेचर एका कुटुंबातील सहा जनावरे दगावली तर प्रत्येकी 16 हजार रुपये, कोंबड्या दगावल्या जास्तीत जास्त प्रति कुटुंब 5 हजार किंवा कोंबडी मागे 50 रुपये भरपाई देण्यात येते. यानुसार भरपाई बाधितांना मिळणार आहे.
जिल्ह्यात “या’ प्रकारे नुकसान भरपाई मिळणार
पुणे जिल्ह्यात 315 कुंटुबातील जनावरे दगावल्याप्रकरणी 84 लाख 20 हजार रुपये निधी मंजूर केला आहे. तर 624. 86 हेक्टर जिरायती पिकांच्या नुकसान प्रकरणी 42 लाख 64 हजार रुपये, 9011.35 हेक्टर बागायती क्षेत्राच्या पिक नुकसान भरपाई 12 कोटी 16 लाख 53 हजार निधी ,तसेच बहुवार्षिक 1691.04 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 3 कोटी 4 लाख 39 हजार निधी असे मिळुन 11327.25 हेक्टर क्षेत्रात झालेल्या नुकसानीपोटी 15 कोटी 63 लाख 56 हजारांचा निधी मंजूर केला आहे.