प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 – शहरात रविवारी झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसाने जवळपास पूर्ण शहरात तळी साचली. या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापनाचा कूचकामी कारभार समोर आला. यावर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने पूरस्थितीला जबाबदार असलेल्या अधिकारी तसेच ठेकेदारांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
पूरस्थितीमुळे झालेले नुकसान, तसेच वाहतुकीचा खोळंबा झालेल्या ठिकाणांची पाहणी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे आणि विलास कानडे यांनी केली. याचा अहवाल हे अधिकारी मंगळवारी आयुक्त विक्रम कुमार यांना सादर करणार आहेत. मंगळवारी डॉ. खेमनार यांनी कोंढवा, येवलेवाडी, हडपसर, कात्रज, आंबिल ओढा; बिनवडे यांनी नगर रस्ता, विश्रांतवाडी, कळस-धानोरी, शिवाजीनगर; तर विलास कानडे यांनी औंध, बाणेर, सूस, पाषाण, बावधन या परिसरांची पाहणी केली आहे.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आज बैठक
पावसामुळे नेमक्या किती घरांमध्ये, तसेच कोठे पाणी शिरले, याची माहिती क्षेत्रीय कार्यालयांना सोमवारी सायंकाळीही संकलित करता आली नव्हती. या माहितीनुसार मंगळवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यात पथ आणि ड्रेनेज विभागांचाही आढावा घेतला जाणार आहे. पुरामुळे माध्यमांनीही महापालिकेवर टीकेची झोड उठल्यानंतर हे सोमवारी अधिकारी माहिती घेण्याच्या कामास लागले. मात्र, रविवारी दुर्लक्ष केल्याने सोमवारी ही माहितीही मिळत नव्हती. त्यामुळे शहरातील नुकसानीची माहिती बैठकीनंतरच समजणार आहे.
पाहणीवेळी आढळलेल्या त्रुटी
ठिकठिकाणी चुकीच्या पद्धतीने पावसाळी वाहिन्या टाकणे
पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य सुविधा न करणे
कॉंक्रीट रस्ते करताना पाणी जाण्यासाठी सुविधा नसणे
ड्रेनेज तसेच नालेसफाईची कामे
व्यवस्थित न होणे