दुसरा भारतीय उपग्रह दोन वर्षांनंतर सोडणार
नवी दिल्ली, दि. 24 – रशियन सहकार्याने भारताचा दुसरा उपग्रह सोडण्यास आणखी दोन वर्षे लागतील, असे अंतराळ संशोधन समितीचे चिटणीस प्रो. सतीश धवन यांनी सांगितले. आज ते मॉस्कोहून इथे परत आले आहेत. त्याबद्दल काल मॉस्को येथे केलेल्या कराराविषयी बोलताना धवन म्हणाले की, पहिला उपग्रह अयशस्वी ठरला तर आम्ही दुसरा उपग्रह तयार ठेवलेला आहे.
केंद्राचे गहू खरेदीचे उद्दिष्ट अशक्य
नवी दिल्ली – रब्बी हंगामाची गहू खरेदी केंद्राने ठरवून दिलेल्या उद्दिष्टाइतकी होईल, असे प्रमुख गहू उत्पादक राज्यांना वाटत नाही. अर्थात उत्तर प्रदेश याला अपवाद राहील. केंद्राने 50 कोटी 27 लाख टन गव्हाची खरेदी व्हावी, असे उद्दिष्ट ठरवून दिले होते.
ज्ञानावर प्रेम करणे हा मनुष्य स्वभाव
कोल्हापूर – ज्ञानावर प्रेम करणे हा मनुष्यस्वभावच होय. म्हणून तर सातासमुद्रापलीकडच्या आइन्स्टाइनसारख्या शास्त्रज्ञाची पुण्यतिथी भक्तिभावाने आपण साजरी करीत आहोत, असे उद्गार कुलगुरू बॅ. पी. जी. पाटील यांनी गणित विभागात आइन्स्टाइनच्या विसाव्या पुण्यतिथी समारंभात बोलताना काढले.
पाक-चीन मैत्रीच्या परीक्षेचा काळ
नवी दिल्ली – चीन व पाकिस्तान यांच्या मैत्रीची परीक्षा घेणारी वेळ आली आहे. मात्र कोणतीही शक्ती या मैत्रीत विघ्न आणू शकणार नाही, असे चीनचे उपपंतप्रधान ली-सीन-निन यांनी सांगितल्याचे रेडिओ पाकचे वृत्त आहे. आमची मैत्री तत्त्वावर आधारित असून ती या पुढेही भरभक्कम होईल, असेही ली-सीन-निन म्हणाले.