बागायतदार शेतकऱ्यांना धान्य पिकवावेच लागेल
मुंबई – काही ठराविक मर्यादेपर्यंत धान्य पिकविल्याखेरीज कोणत्याही शेतकऱ्याला केवळ नगदी पिके काढण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट खुलासा महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री वसंतदादा पाटील यांनी विधानसभेत केला. ते पुढे म्हणाले, कालव्याच्या पाण्याच्या नजीकच्या जमिनीत सव्वादोन हेक्टरपेक्षा जास्त ऊस न पिकविण्याचे बंधन शेतकऱ्यांवर घालण्याचा सरकार विचार करीत आहे.
गोदावरी, नीरा, प्रवरा यांच्या कालव्यांचे 50 टक्के पाणी नगदी पिकांसाठी वापरले जाते. येत्या दोन महिन्यांत 29 धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यात 37000 हेक्टर जमीन ओलीताखाली येईल तसेच कालव्याचे 50 टक्के पाणी धान्य उत्पादनासाठी वापरण्याचे बंधन शेतकऱ्यांवर असल्याने आणखी 25 हजार हेक्टर जमीन धान्य उत्पादनाखाली येईल.
इंजिनिअरिंग कामगारांना किमान वेतन मिळणार
पुणे – इंजिनिअरिंग कामगारांना किमान वेतन दर देण्याचा हुकूम मुंबई हायकोर्टाने दिला असल्याचे सर्व श्रमिक संघटनेने काढलेल्या पत्रकांत म्हटले आहे. या हुकुमाच्या स्थगितीसाठी मालकांनी मुंबई हायकोर्टात मनाई हुकूमासाठी अर्ज केला होता. यामुळे किमान वेतन दर व दैनंदिन रुपये 1950, खास भत्ता याची अमंलबजावणी करून घेण्याचा मार्ग कामगारांना मोकळा झाला आहे.
देशभर कायदेभंगाची चळवळ सुरू करा
पाटणा – 6 मार्च रोजी जयप्रकाश यांनी पार्लमेंटवर मोर्चा नेऊन ज्या मागण्या सादर केल्या त्या मान्य व्हाव्यात यासाठी जयप्रकाश यांनी देशभर सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करावी. लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करावी, असे आवाहन समाजवादी नेते फर्नांडिस यांनी जयप्रकाश यांना केले आहे.