पुणे – पुणे मार्केट यार्ड स्थापन झाल्यापासून प्रथमच लिंबाला आताइतका उच्चांकी भाव मिळाला आहे. सध्या घाऊक बाजारात चांगल्या दर्जाच्या लिंबांच्या 15 ते 20 किलोच्या एका गोणीस तब्बल 3,500 रुपये भाव उच्चांकी भाव मिळाला. तर, किरकोळ बाजारात 1 लिंबू 10 ते 20 रुपयांपर्यंत मिळत आहे.
याबाबतची माहिती लिंबाचे व्यापारी आणि श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे संचालक रोहन जाधव यांनी माहिती दिली. येथील बाजारात गेल्या दीड महिन्यांपूर्वी तीन ते चार हजार गोणी लिंबाची आवक होत होती. मात्र, सध्या ही आवक निम्म्यावर आली आहे. भावात गोणीमागे दीड महिन्यांत जवळपास हजार रुपयांनी वाढ झाली आहे. दर्जानुसार काही लिंबांच्या गोणीस अडीच हजार रुपये भाव मिळत आहे.
जूनपर्यंत तुटवडा?
सध्या घरगुती ग्राहकांसह हॉटेल्स, रसवंतीगृह आणि ज्यूस सेंटरकडून लिंबाला मागणी वाढली आहे. जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत.
अन्य राज्यांतूनही आवक
बाजारात नगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून लिंबांची आवक होते. मात्र, यंदा हैदराबाद, चेन्नईतूनही व्यापारी मालाची आवक जास्त होत आहे.
आंध्र प्रदेशात सर्वाधिक लिंबू उत्पादन
देशभरातील 40-45% लिंबाचा पुरवठा आंध्र प्रदेशातील जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या इल्लूर बाजारातून होतो. शिवाय, गुंडूर जि. तिरुपती येथूनही पुरेसा लिंबू पुरवठा देशभरात होतो. आंध्र प्रदेशातील माती लिंबू उत्पादनासाठी उत्तम आहे. त्याला वारंवार पाणी देण्याची गरज नाही. लिंबूचे फळ 3-4 वर्षांत येते व पुढील 5 वर्षे फक्त खत, पुरेसे पाणी ते जिवंत ठेवते, उत्पादन मिळत राहते. लिंबासाठी सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे. यंदा आंध्र प्रदेशातून लिंबांची आवक पुण्यात होत असली, तरी दरवर्षीच्या तुलनेत त्याचे प्रमाण बरेच कमी आहे, असे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदवले.
उन्हाळ्यात लिंबाच्या झाडांना पाणी खूप लागते. पाणी चांगले मिळाले, तर उत्पन्नही चांगले मिळते. यंदा पाण्याअभावी उत्पन्न कमी झाले असून लिंबांची आवक घटून भाववाढ झाली आहे. लिंबाला आजपर्यंत उच्चांकी अडीच हजार रुपये भाव मिळाला होता. – रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी, मार्केट यार्ड.