मंत्र्यांच्या वागणुकीवर देखरेख ठेवली जावी
पाटणा, दि. 31 – तीन प्रामाणिक व विश्वासू व्यक्तींची एक दक्षता समिती केंद्रात नेमावी व तिने मंत्र्यांच्या वागणुकीवर देखरेख ठेवावी, अशी सूचना केंद्रीय अर्थ खात्याचे राज्यमंत्री एस. सी. आगरवाल यांनी केली आहे. आपल्या सूचनेबद्दल बोलताना आगरवाल पुढे म्हणाले, अशा बिनसरकारी दक्षता समितीमुळे मंत्र्यांना मोठा मानसिक दबाव येईल व तो दबाव त्यांना चुकीच्या वागणुकीपासून परावृत्त करील. राज्यातही अशा दक्षता समित्या स्थापन केल्या जाव्यात, अशीही त्यांनी सूचना केली.
गदिमांच्या जीवनावर ‘निर्मोह’ कादंबरी
पुणे – ग. दि. माडगूळकर यांच्या जीवनावर डॉ. प्रभाकर तामणे यांनी ‘निर्मोह’ नावाची कादंबरी लिहिण्याचा संकल्प सोडला आहे. अलौकिक प्रतिमेचं वरदान घेऊन जन्माला आलेले ग. दि. माडगूळकर नुकतेच गेले. गेल्या कित्येक वर्षांत मराठी साहित्यात एवढी प्रचंड लोकमान्यता मिळालेला कवी, साहित्यिक दुसरा झाला नाही. माडगूळकर अण्णांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने मराठी वाङ्मयाची सर्वत्र प्रांगणे काबीज केली होती. अशा या महान कवीच्या जीवनावर आधारलेली कादंबरी लिहिली जात आहे.