पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग सोडावा
जम्मू, दि. 21 – पाकिस्तानने काश्मीरचा बळकावलेला भाग स्वतंत्र करावा. त्या भागावर पाकिस्तानचा कायदेशीर व नैतिक हक्क पोहचत नाही, असे काश्मीरचे मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला म्हणाले.
या अनैसर्गिक विभागणीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ज्यांना युद्धबंदी रेषा ओलांडून अखरेचा निर्णय घ्यावयाचा आहे. त्यांच्या दृष्टीने तर फारच गुंतागुंत निर्माण झाली आहे. शेख अब्दुला पुढे म्हणाले, पाकिस्तानने भारताशी दोन लढाया केल्या. याचा परिणाम सीमेवरील लोकांचा संपर्क तुटला. त्यापैकी अनेक लोकांना कित्येक प्रश्नास तोंड द्यावे लागत आहे.
आफ्रिकेतील लढ्यास सहाय्य हवे!
बेलग्रेड – झिम्बाब्वे, नामिबिया व इतर भागातील मुक्ती लढ्यास सक्रिय साह्य करण्याचे आवाहन युगोस्लाव्हिया व झांबिया यांनी येथे प्रसिद्ध केलेल्या एका संयुक्त पत्रकाराद्वारे सर्व लोकशाहीवादी, वसाहतवाद व वंशवाद विरोधी देशांना केले आहे.
झांबियाचे परराष्ट्रमंत्री सिटके म्वाल यांच्या भेटीच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या वरील पत्रकात नामिबिया, झिम्बाब्वे व द. आफ्रिकेतील जनतेच्या मुक्ती लढ्यास खीळ घालण्याचा निष्फळ प्रयत्न करणाऱ्या वंशवादी देशांना दोष देण्यात आला. अलिप्त राष्ट्रांचे ऐक्य दृढ केले जाणार.