पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत राज्यात ४४६ कॉपी प्रकरणे आढळली आहेत. यात दहावीला १४० आणि बारावीला ३०६ कॉपीची प्रकरणे सापडली. यात छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक २२८ कॉपीची प्रकरणे सापडली आहेत.
राज्य मंडळाने यंदाही कॉपीमुक्त अभियान राबविले होते. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभाग व महसूल विभागाची पथकेही नियुक्त करण्यात आली होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेत सन २०२३ मध्ये राज्यात ११६ प्रकरणे आढळली होती. यावर्षी १४० पर्यंत आकडा गेला आहे. कोल्हापूर व कोकण विभागात इयत्ता दहावीला एकही कॉपीचा गैरप्रकार आढळून आलेला नाही. बारावीच्या परीक्षेत मागील वर्षात ३४५ तर यंदा ३०६ कॉपीची प्रकरणे सापडली सापडली आहेत.
कॉपी करण्यात यंदाही छत्रपती संभाजी नगर विभाग आघाडीवर असल्याचे होता. बारावीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर विभागात २०२३ मध्ये १११ विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडले होते. यंदा ही संख्या १४२ पर्यंत पोहोचली. दहावीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर विभागात ८६ कॉपीची प्रकरणे आढळली असून हा विभाग पहिल्या क्रमांकावरच आहे. पुणे विभागात दहावीच्या परीक्षेत १९ तर बारावीच्या परीक्षेत ६८ कॉपीची प्रकरणे सापडली आहेत.
कॉपीची २०२४ मधील विभाग निहाय प्रकरणे
विभाग – दहावी – बारावी
पुणे – १९ – ६८
नागपूर – १३ – १८
छत्रपती संभाजीनगर – ८६ – १४२
मुंबई – ०१ – ११
कोल्हापूर – ०० – ००
अमरावती – ०५ – ११
नाशिक – ०६ – २३
लातूर – १० – २६
कोकण – ०० – ०७