चिंबळी, (वार्ताहर) – चाकण,आळंदी व भोसरी प्रवासासाठी इंद्रायणी नदीवरील पर्यायी समजले जाणारे बहुप्रतिक्षीत केळगाव-डुडुळगाव पुलाचे गेले दहा वर्षांपासून रखडलेले काम अखेर सुरू झाले असून पुलाची जोड पिंपरी -चिंचवड महानगरपालिका हद्दीत अंतिम टप्प्यात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मोशी टोल नाका इंद्रायणी नदी पूल व आळंदी नवा व जुना पूल यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. शिवाय पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करण्यासाठी इंद्रायणी नदीवर एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
आळंदीत कार्तिकी व आषाढी दरम्यान होणारी गर्दी देखील यामुळे विभागली जाणार आहे. शिवाय केळगाव, चिंबळी, डुडुळगाव, मोशी आदी गावांना या पुलामुळे जोडले जाणार आहे. या पुलाचे दोन पिलर उभे करण्याचे काम बाकी होते व पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीत रस्ताजोड बाकी होते हे विषय आता मार्गी लागले आहेत. पिलर उभे करून रस्ता जोडला जाऊन आषाढी यात्रेपर्यंतच हा मार्ग खुला होऊ शकतो.
चिंबळी-आळंदी रस्त्यावर आसाराम बापू आश्रम समोर हा पूल आहे. हा पूल होणार असल्याने गेल्या दहा वर्षात अनेकांनी या भागात जागा, प्लॉट खरेदी करत घरी उभारली होती; मात्र पूल रखडल्याने प्रवासाची अडचण झाली होती. पूल रखडल्याने या भागातील काही जागा विकसनापासून वंचित राहिल्या होत्या यामुळे अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी, शासन,महानगरपालिका याकडे नागरिक पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी करत होते. अखेर काम सुरू झाल्याने त्यांनी देखील समादान व्यक्त केले आहे.
भूसंपदानामुळे काम रखडले होते
दहा वर्षांपूर्वी पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर वर्षभरात केळगाव बाजूने पूल उभा राहिला होता. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका डुडुळगाव बाजूने जोडरस्ता जागा संपादनाबाबत वाद उभा राहिल्याने अनेक वर्षे पुलाचे काम रखडले होते आता पुन्हा काम सुरु झाल्याने पुलाचा प्रश्न निकाली निघाला आहे.