पुणे – माजी सैनिकांच्या पत्नींनी पुढाकार घेत स्थापन केलेल्या वाहतूक कंपनीच्या माध्यमातून खरेदी केलेल्या 44 बस पीएमपीच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत. या बसेस दि. 1 नोव्हेंबरपासून नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
राज्यातील 6 जिल्ह्यांतील 600 माजी सैनिकांच्या पत्नींनी एकत्र येत स्वयं सहाय्यता गट स्थापन केला आहे. या माध्यमातून वाहतूक कंपनी स्थापन केली आहे. कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या 44 बस खरेदी करण्यात आल्या आहेत. त्या बस पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत. स्वयं सहाय्यता गटातील महिलांनी स्वत:च्या पैशांची बचत आणि बॅंकेकडून कर्ज घेत बस खरेदी केल्या आहेत.
माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी चालविलेल्या गटामार्फत 44 बस भाडेतत्त्वावर घेण्याला पीएमपी संचालक मंडळाने गेल्या वर्षी मान्यता दिली होती. त्यानुसार आता महिला बचत गटाने विश्व योद्धा शेतकरी मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचे मुख्यालय सातारा असून, त्यामध्ये सहा जिल्ह्यांतील 600 महिलांचा समावेश आहे. या कंपनीचा पुढील सात वर्षांसाठी पीएमपीशी करार झाला आहे.
तसेच, या बसवर चालक आणि वाहक म्हणून अनुक्रमे माजी सैनिक आणि सैनिकांच्या पत्नी, हुतात्मा सैनिकांच्या पत्नी, मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे 180 जणांना रोजगार प्राप्त होणार आहे, अशी माहिती राज्याच्या सैनिक कल्याण मंडळाचे संचालक कर्नल आर. आर. जाधव (नि.) यांनी दिली.