ओळख पटविणे ठरतेय आव्हान : पोलिसांनाच करावे लागतात अंत्यसंस्कार
पिंपरी – उपासमारीमुळे शरीर अचानक साथ सोडते आणि मृतदेह कुठेतरी पडतो. जवळ कागदपत्र किंवा ओळख पटविण्याचा पुरावा नसल्याने त्या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरते. पिंपरी-चिंचवड परिसरात मागील सहा महिन्यांत असे 42 अनोळखी मृतदेह आढळले आहेत.
राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकजण शहरात दाखल होतात. भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी औद्योगिक नगरीत वणवण सुरू होते. कधी काम मिळते तर कधी उपासमारीची वेळ येते. शहरात भीक मागणाऱ्या आणि भटक्या लोकांची संख्याही वाढत आहे. उपासमारीमुळे शरीर अचानक साथ सोडते. त्यानंतर मृतदेह रस्त्याच्या बाजूला, भाड्याच्या खोलीत, सार्वजनिक ठिकाणी कुठेही पडलेला आढळतो. सर्वसामान्य नागरिक पोलिसांना फोन करून याबाबत माहिती देतात.
पोलीस त्या मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी दाखल करतात. मृतदेहाची ओळख पटवून नातेवाइकांचा शोध घेऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जातो. मात्र अनेकदा मृतदेहाची ओळख पटत नाही. अशा वेळी काही दिवस मृतदेह शवगृहात ठेवला जातो. दरम्यान ओळख पटविण्यासाठी पोस्टर तसेच वृत्तपत्राच्या माध्यमातून माहिती प्रसारित केली जाते. मात्र तरीही ओळख पटली नाही, नातेवाईक मिळाले नाहीत तर कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून पोलीसच त्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करतात. अनेक वर्ष घरापासून, आपल्या लोकांपासून दूर भटकत राहिलेल्या लोकांच्या मृत्यूबाबत नातेवाइकांना माहिती मिळत नाही.
एखाद्या आजाराने अथवा वृद्धापकाळाने मृत्यू झाला असल्यास त्यास नैसर्गिक मृत्यू म्हणून जाहीर केले जाते. त्याबाबत कोणताही गुन्हा दाखल होत नाही. मात्र काही घटनांमध्ये अनोळखी मृतदेह संशयास्पदरित्या आढळतात. गळफास घेणे, औषध पिणे, उंचावरून पडणे, गंभीर दुखापत, अपघाती मृत्यू असे मृत्यू हे अनैसर्गिक म्हणून गणले जातात. मागील सहा महिन्यांत असे अनैसर्गिक मृत्यू झालेले सहा अनोळखी मृतदेह आढळले आहेत. काही मृतदेह अगदी कुजलेल्या अवस्थेत देखील आढळलेले आहेत. एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर तिच्याबाबत विचारण्यासाठी सुद्धा कुणी आले नाही. एखाद्या घरातून, परिसरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर कुजलेले मृतदेह समोर येतात. मागील सहा महिन्यांत आढळलेल्या अनोळखी मृतदेहांमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.
पोलिसांना करावा लागतो खर्च
अनोळखी मृतदेह आढळल्यानंतर पोलीस मृतदेहाची ओळख पटवतात. ओळख पटली नाही तर त्या मृतदेहावर पोलीस स्वखर्चाने अंत्यसंस्कार करतात. कफन, दहन खर्च, रुग्णवाहिका असा सुमारे दोन ते तीन हजार रुपये खर्च एका मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यासाठी येतो. नातेवाईक नसल्याने, ओळख न पटल्याने हा भार पोलिसांना सोसावा लागतो.
===========