शासनाच्या भूमिकेवर संताप : भामा आसखेड जॅकवेलचे काम बंद पाडले
शिंदे वासुली – पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलचे काम ज्या पद्धतीने व ज्या गतीने चालू आहे, त्या गतीने भामाआसखेड प्रकल्ग्रपस्तांचे पुनर्वसन संबंधित प्रश्न सुटले जात नाहीत, असे आरोप करून जोपर्यंत शासन गंभीरपणे दखल घेत नाहीत तोपर्यंत जॅकवेल व जलवाहिनीचे काम बंद करण्याची मागणी करत सुमारे चारशे प्रकल्पग्रस्तांनी आज शुक्रवारी (दि. 27) धरणावर करंजविहीरे येथे पोलिसांच्या समोरच ठिय्या आंदोलन केले. जॅकवेलचे कामदेखील बंद पाडण्यात आले.
धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य होईपर्यंत जलवाहिनीचे एक किमीचे काम बंद ठेवणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने आश्वासन देऊनही वारंवार संबंधित कामाचा ठेकेदार काम चालू करत असल्याच्या घटना घडल्या होत्या. गुरुवारी (दि. 26) धरणग्रस्त, पोलीस प्रशासन, पुणे मनपाचे अधिकारी व ठेकेदार यांनी थोपटवाडी येथे बंद असलेल्या जलवाहिनीच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी त्याठिकाणी जलवाहिनीसाठी पाइप पसरविल्याचे दिसून आले संतप्त शेतकऱ्यांनी ते काढून घेण्याची विनंती केली. अन्यथा 27 तारखेला जॅकवेल व पाइपलाइन अशी दोन्ही कामे बंद करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार आज शुक्रवारी शासन शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम सुरू करते हा आमचा विश्वासघात आहे, असा आरोप करीत जोपर्यंत जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम बंद केले जात नाही आणि ठरल्याप्रमाणे जे एक किलोमीटर जलवाहिनीचे काम बाकी ठेवायचे आहे त्या ठिकाणी पसरविलेले लोखंडी पाइप उचलले जात नाही तोपर्यंत ठिय्या मोडणार नाही, असा पवित्रा भामा आसखेड प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी घेतला. यावर चर्चा होऊन देखील जर ठेकेदार एक किलोमीटरचे काम सुरू ठेवत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
याप्रसंगी माजी उपसभापती बनसु होले, सत्यवान नवले, देविदास बांदल, गजानन कुडेकर, किरण चोरघे, किसन नवले, तानाजी नवले, स्वप्नील येवले, तुकाराम नवले, शांताराम शिवेंकर, तुकाराम गवारी, गणेश जाधव, मल्हारी शिवेकर, निवृत्ती नवले, संभाजी कोळेकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जूनपासून पोलीस बंदोबस्तात मनपाच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलचे काम चालू आहे. आज मोठ्या संख्येने आंदोलक येणार असल्याने येथील बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे धरण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.
शासनाकडून आमची फसवणूक होत असून मागील दीड वर्षापासून कोणतीही मीटिंग झाली नाही. प्रशासनाने आमच्यावर बळजबरी करू नये तसे केल्यास कुटुंबासह पाण्यात उतरून जलसमाधी घेऊ.
-देविदास बांदल, आंदोलन प्रमुख
आमच्यासमोरच चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या उपस्थितीत संबंधित ठेकेदाराने जॅकवेलचे काम बंद केले आहे; परंतु आम्हाला तिथून हटवण्याचा आणि उद्या पुन्हा काम चालू करण्याचा डाव असेल तर आज चारशे आले उद्या हजारो येथील. आचार संहिता असली तरी न्यायासाठी आम्ही लढणारच.
-सत्यवान नवले, आंदोलन प्रमुख
शेतकऱ्यांनी जॅकवेलच्या कामाला विरोध करु नये, ते काम पूर्ण होईपर्यंत आमचा बंदोबस्त राहणार आहे; परंतु जलवाहिनीचे बंद असलेले एक किलोमीटरचे काम होणार नाही. जे एक किलोमीटर अंतराचे काम बाकी ठेवायचे आहे, त्याला आम्ही बंदोबस्त देणार नाही. शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्गाने जावे. सध्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सर्वांना आवाहन आहे.
-कल्याण पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण