मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. त्यातच रविवारी राज्याची चिंता वाढवणारी माहिती समोर आली. राज्यात एकाच दिवशी ५५२ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा ४ हजारांहून अधिक झाला आहे. राज्यात रविवार दिवसाअखेरपर्यंत रुग्णांची संख्या ही ४ हजार २०० वर पोहोचली आहे, यातील सर्वाधिक म्हणजे २ हजार ७२४ रुग्ण हे राजधानी मुंबईमधले आहेत. मुंबईत रविवारी ४५६ नवे रुग्ण समोर आले आहेत.
कोरोना विषाणूच्या बाधेमुळे रविवारी १२ जणांचा मृत्यू झाला यामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही २२३ वर पोहचली आहे. रविवारी मृत्युमुखी पडलेल्या १२ रुग्णांपैकी ६ मुंबई, ४ मालेगाव आणि प्रत्येक एक रुग्ण हा सोलापूर आणि अहमदनगरमधला आहे.
महाराष्ट्रात मार्चपासून ७ एप्रिलपर्यंत ३० दिवसांच्या कालावधीत रुग्णांचा आकडा हा १ हजारांवर पोहोचला. ७ एप्रिल ते १३ एप्रिल या सहा दिवसांच्या काळात हाच आकडा वाढून तो २ हजारांवर पोहोचला. तर पुढच्या तीन दिवसांत तो ३ हजारांवर पोहोचला. तर त्यानंतर तीन दिवसांत रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा तीन हजारांवरून ४ हजारांवर पोहोचला. राज्यात आतापर्यंत ७२ हजार २३ स्त्राव चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यातल्या ६७ हजार ६७३ लोकांच्या चाचण्यांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत राज्यात ५०७ लोक पूर्णपणे बरे झाले आहेत तर ८७ हजार २५४ लोक होम क्वारंटाइन आहेत.