– कृष्णा पाटील
बरोबरीचे वर्गमित्र कुठल्या कुठं गेले. कोण आयएएस झाला, तर कोण पोलीस अधिकारी झाला. आपण मात्र साहेबांचे खंदे समर्थक, विश्वासू साथीदार, निष्ठावंत कार्यकर्ताच राहिलो. “घरात नाही ज्वारीचा दाणा आणि पुढारी उताणा’, अशी आपली अवस्था. उद्या पोरांनी विचारलं, तर बापाचं कर्तव्य काय सांगायचं? कॉलेज केलं असतं, तर आज क्लास वन ऑफिसर झालो असतो, पण त्यावेळी आपण प्राचार्यांचं ऐकलं नाही. आई-बापाचं ऐकलं नाही. राजकारणाच्या नशेत पळतच राहिलो.
गरिबांचा बुलंद आवाज, तरुणांचे हृदय सम्राट, आण्णासाहेबांना प्रचंड मतांनी विजयी करा…, “खटक्यावर बोट… जाग्यावर पलटी…’, “नाद नाय करायचा पळशीच्या वाघाचा…’, “येऊन येऊन येणार कोण? आण्णाशिवाय हायचं कोण?’, “आत्ता न्हाय तर कधीच न्हाय…’
साहेबांच्या प्रचारानं जोर धरला होता. घोषणांनी सत्तूचा आवाज पार बसला होता. दिवसभर पायाला भिंगरी. एका दिवसाला पाच-सहा गावं फिरायची. मतदान जवळ आलं होतं. एकच धांदल उडालेली. गावागावात बूथ नेमायचे. मतदारयाद्या तपासायच्या. पोलिंग एजंट नेमायचे. स्लिपा वाटायच्या. मतदानाच्या आदल्या दिवशी जेवणावळी आणि इतर गोष्टी. सगळी कामं सत्तूला करावी लागायची. साहेबांचा सत्तूवर खूप विश्वास होता. सत्तू म्हणजे भरवशाचा कार्यकर्ता, आघाडीचा नेता. पक्ष वाढवावा तर सत्तूनं. मतदान ओढून आणावं तर सत्तूनं. सत्तू म्हणजे साहेबांचा उजवा हात. सत्तू म्हणजे मुलूख मैदान तोफ. धाडसाचं दुसरं नाव म्हणजे सत्तू.
साहेबांचा प्रचार शिगेला पोहोचलेला. प्रचाराच्या जिपा फिरायला लागलेल्या. एका वेळी तीन-चार जिपा गावात शिरल्या, की धुळीचा लोट उठायचा. सगळा गोंगाट. कुणाचा कुणाला आवाज कळायचा नाही. त्यातच पायी पदयात्रा निघालेल्या. मतदारांच्या घरोघरी जावं लागत होतं. कधी-कधी दोन गट आमने-सामने यायचे. एकमेकाकडं भेदक नजरेनं बघायचे, पण नेतेमंडळी पुढं होऊन आपापल्या गटाची समजूत काढायचे.
पळशीत दोन गटात बाचाबाची झाली. शिवीगाळ सुरू झाली. हाणामारी होणार, एवढ्यात सत्तूला फोन आला. सत्तूनं निरोप दिला, “आमरापुरातून आलोच. तुम्ही शांतता राखा.’ सत्तूनं फोनवरूनच कार्यकर्त्यांना दरडावलं. अर्ध्या तासात सत्तू हजर. दोन्ही गट समोरासमोर भिडलेले. हातात काट्या, दगड. एकमेकांना शिवीगाळ सुरूच होती. सत्तू आला, तसा गर्दीत शिरला. सगळ्या पोरांना आवाहन केलं. शांत करून घरी पाठवलं. सत्तूमुळं बाका प्रसंग टळला. सत्तू आला नसता, तर कुणाची तर खांडोळी झाली असती. काठ्या-कुऱ्हाडीची भांडणं सत्तूला अंगावर घ्यायची भारी आवड. या गुणांमुळेच सत्तूवर साहेबांचा जीव होता. सत्तूही पक्षाचं काम मनापासून करत होता.
पक्षाचं काम करताना सत्तूचं कॉलेज सुटलं. नेहमी डिस्टिंक्शन मिळवणारा स्टुडंट, पण राजकारणात पडला आणि शिक्षण संपलं. एकदा प्राचार्यांनी बोलावून घेतलं आणि म्हणाले, “सत्तू तू कॉलेज संपवून राजकारणात गेला असतास, तर बरं झालं असतं. निदान पदवीधर तरी हो. पदवी असल्यावर राजकारणात पण किंमत मिळते. खरं तर राजकारणापेक्षा तुला “क्लास वन अधिकारी’ झालेलं पाहायचं होतं आम्हाला. तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तुझ्याकडं टॅलेंटही आहे. तुला खूप चांगल्या पगाराची नोकरी लागू शकेल. काहीही कर. पण पहिला स्थिरस्थावर हो. मग बेशक राजकारणात जा.’
“सर, नोकरी करण्यापेक्षा मी नोकरी देणारा होणार आहे. आपला वट तुम्हाला माहीत आहे. शिवाय साहेबांचा आशीर्वाद आहेच. साहेब आहेत, तोपर्यंत काहीच कमी नाही. कदाचित येणाऱ्या पंचायतीला आपणच उमेदवार असू. आपला फक्त आशीर्वाद पाठीशी असूद्या.’ सत्तू म्हणाला. सर काही न बोलता चेंबरला निघून गेले.
सत्तू राजकारणात गेला. साहेबांचा पर्मनंट कार्यकर्ता झाला. विश्वासू सेवक बनला. आज निवडणुकीची सर्व धुरा त्याच्यावरच होती. मतमोजणी झाली. साहेब निवडून आले. साहेबांची विजयी मिरवणूक निघाली. गुलालाची उधळण. ट्रकच्या टपावर झांजपथक. रस्त्यावर तरुणांची गर्दी. कार्यकर्त्यांच्या घोषणा. परिसर दुमदुमत होता. गुलालाची उधळण होत होती. सत्तू गुलालानं गुलाबी झालेला. पळून पळून घामाघूम झालेला. ओरडून ओरडून घसा बसलेला. केसांतून घामाच्या धारा लागलेल्या. टी-शर्ट भिजलेला. सभेच्या ठिकाणी येईपर्यंत पाय मोडल्यासारखे झालेले. साहेब गाडीतून उतरले. फटाक्यांच्या माळा पेटल्या. आभाळात धुराचा लोट उसळला. “आण्णासाहेबांचा विजय असो, आण्णासाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!’ अशा गगनभेदी घोषणा. ही ीीी गर्दी.
आण्णासाहेबांच्या सत्कारासाठी भव्य मंडप उभारलेला. स्टेजवर पांढऱ्याशुभ्र कापडाच्या वीस-पंचवीस खुर्च्या. पाठीमागे आण्णासाहेबांच्या फोटोचं मोठं पोस्टर. बाजूला नारळाचं पोतं. एका आडव्या काठीला हार अडकवलेले. गुलाबाच्या फुलांचा बिंडा एका खुर्चीवर ठेवलेला. विजयी मिरवणूक मंडपात आली. गर्दी खचाखच भरलेली. उभं राहण्यासाठी पण जागा नव्हती. आण्णासाहेब गाडीतून उतरले, तसे स्टेजवर गेले. अनेक कार्यकर्त्यांचे सत्कार झाले. प्रत्येक कार्यकर्ता स्टेजवर यायचा. साहेबांचा हात पाठीवर पडायचा. कार्यकर्त्याला मग धन्य धन्य वाटायचं. साहेबांचा आशीर्वाद मिळाला, की कार्यकर्ता दुप्पट ऊर्जा घेऊन कामाला लागायचा. खूप उशिराने सत्कार संपले.
सत्तूनं प्रास्ताविक केलं. सर्व कार्यकर्त्यांना शाबासकी दिली आणि म्हणाला, “साहेबांचा विजय तो आपलाच विजय आहे. साहेबांसाठी तुम्ही रात्रंदिवस झटलात. मतदान गोळा करण्यासाठी लढलात. यापुढं पण आपली एकी अशीच ठेवू या. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.’
मग साहेब बोलायला उठले.
“हा नेत्रदीपक विजय माझा नसून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्ते हाच माझा प्राण आहे. कार्यकर्ते हाच माझा श्वास आहे. सर्व कार्यकर्त्यांचे अंत:करणापासून आभार. असंच माझ्या पाठीशी राहा आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्या.’ साहेबांच्या भाषणाने टाळ्यांचा कडकडाट झाला. उशिरापर्यंत टाळ्या सुरूच होत्या. अखेर साहेबांनी हात उंचावून थांबण्याची खूण केली. मग सभामंडप शांत झाला. साहेबांचं भावपूर्ण भाषण संपलं. साहेब मुंबईला रवाना झाले.
आता महिना दोन महिन्यांतून साहेब तालुक्याला येतात. त्यावेळी सत्तूलाच साहेबांची सगळी सोय करावी लागते. आठ-दहा दिवस त्यांच्याबरोबर दौरे, मीटिंग, माती आणि लग्नं असं करत फिरावं लागतं. साहेब सत्तूला घेतल्याशिवाय मतदारसंघात जातच नाहीत. दौरा संपला, की साहेब पुन्हा मुंबईला जातात. महिना दोन महिन्यांतून पुन्हा तालुक्याला येतात.
साहेब आमदार होऊन दोन-तीन वर्षं झाली होती. आता पंचायतीचं इलेक्शन तोंडावर आलं होतं. पंचायतीच्या तिकिटांसाठी साहेबांकडं उमेदवारांची रांग लागलेली. कुणाला तिकीट द्यायचं, हे साहेबच ठरवणार होते.
पंचायत समितीला सत्तू इतका तगडा उमेदवार नव्हता. मतदारसंघात शोधूनही दुसरा सापडणार नाही, इतकं सत्तूचं काम होतं. त्यामुळं सत्तूचं तिकीट पक्कं ठरलेलं. फक्त डिक्लेअर करणं बाकी होतं. सत्तूची अगोदरपासूनच तयारी चालली होती. कार्यकर्ते खूश होते. सत्तूला आपण केलेल्या कामाचं चीज होणार, असं वाटायला लागलं. सत्तूला पुरेपूर विश्वास होता, की “साहेब तीन-चार दिवसांत येणार आणि तिकीट वाटपाचं काम करणार. सर्वांना योग्य त्या सूचना देणार. आपली शीट भरघोस मतांनी निवडून येणार. त्यासाठी साहेब आखणी करून देणार. मगच मुंबईला परत जाणार.’
तालुक्यातले सर्व कार्यकर्ते साहेबांची वाट पाहात होते. आठवड्याभरात तिकीट वाटप होणार आणि आज अचानक बातमी थडकली, की पंचायतीला आरक्षण पडलं आहे. दुसऱ्या वर्गाच्या उमेदवाराला संधी मिळणार. म्हणजे सत्तूच्या तिकिटाचा विषय संपला. सत्तूची मोठी संधी हुकली. सत्तू आणि कार्यकर्ते निराश झाले.
साहेब आले आणि सर्वांची समजूत काढली. सत्तूला ते म्हणाले की, “एका लुगड्यानं कुणी म्हातारं होत नाही. अजून लांब टप्पा आहे. आपण पुढच्या वेळी नक्की तुझा विचार करू. आता रुसण्या फुगण्याची वेळ नाही. कामाला लागलं पाहिजे. विरोधी पक्षानं प्रचारात बरीच आघाडी घेतलीय. त्यामुळं आपल्याला असं बसून चालणार नाही.’
साहेबांचं शाब्दिक आव्हान संपलं. मग सर्व कार्यकर्ते जोमानं कामाला लागले. अर्थातच सत्तू सर्वांच्या पुढं होता. सत्तूनं गाव ना गाव पिंजून काढलं. मतदारसंघात दोन वेळा घरोघरी फेरी मारली. रात्रीचा दिवस केला. प्रत्येक वाड्या-वस्तींवर जाऊन मतदारांची भेट घेतली. मतदान झालं. दुसऱ्याच दिवशी निकाल लागला. पंचायतीमध्ये साहेबांच्या गटाला घवघवीत यश मिळालं होतं. साहेबांनी सत्तूच्या पाठीवर हात ठेवला. त्याचं अभिनंदन केलं आणि शाबासकीही दिली.
दिवस असेच जात होते. आता सत्तूच्या लग्नाचं वय झालं होतं. त्याचे वडील स्थळ शोधत होते. सत्तूला मात्र अजिबात वेळ मिळत नव्हता. साहेबांची कामं, मतदारसंघातली कामं, अडचणी असं सगळं बघावं लागायचं. कधीकधी साहेबांच्या घरातली व्यक्तिगत कामंदेखील करावी लागायची. कारण, साहेबांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी सत्तू एक होता.
सत्तूच्या वडिलांनी पळापळ करून कसंतरी त्याचं लग्न जमवलं. दोन्ही बाजूच्या मंडळींनी तारीख ठरवली. घरी आल्यावर सत्तूला वडील म्हणाले, “येत्या दहा तारखेला लग्नय तुझं. आता बाहेरची कामं बास झाली. लग्नाकरता तरी वेळ काढ.’
त्यावर सत्तू म्हणाला, “लग्नाची तारीख साहेबांच्या वेळेनुसार ठरवावी लागंल. अशी अचानक तारीख धरून कसं चालंल? मी साहेबांची तारीख आणि वेळ निश्चित करून येतो. मग आपण तारीख पक्की करू.’
“आता आम्ही तारीख फिक्स केलीय. उगीच फाटं फोडू नकोस.’ सत्तूचे वडील तावातावानं म्हणाले, पण सत्तूनं वडलांचं काहीही ऐकलं नाही. सत्तू आणि मित्रमंडळी मुंबईला गेले. साहेबांना लग्नाची आनंदाची बातमी सांगितली. साहेबांनी सत्तूचं अभिनंदन केलं आणि “तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला मी नक्की येणार’, असं सांगितलं. मग पीएला बोलावून घेतलं. पीएनं डायरी पाहिली आणि साहेबांच्या वेळेनुसार तारीख ठरवली.
सत्तू बाहेर पडताना साहेबांना म्हणाला, “साहेब, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही लग्नाला आलं पाहिजे. मला बाकीचं काही माहीत नाही. मी माझ्या सासरवाडीच्या लोकांचं ऐकलं नाही. खुद्द माझ्या वडिलांनी तारीख धरली होती, पण तीसुद्धा बदलली. मी त्यांना सांगितलंय की, “साहेबांच्या वेळेनुसारच माझं लग्न होईल. साहेबांची वेळ हाच माझ्या लग्नाचा मुहूर्त असंल.’ यावर वडील काही बोलले नाहीत, पण थोडे नाराज झाले. पण मला काही वाटलं नाही. म्हणून तुम्ही यायला लागतंय साहेब. नाहीतर त्या दिवशी अचानक काम निघंल. तसं काही करू नका.’
सत्तू भावुक झालेला पाहून साहेब उठले आणि त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, “मी नक्की येईन. सत्तूच्या लग्नाला आम्ही येणार नाही असं होईल का?’
साहेबांच्या आश्वासनानंतर सत्तू आणि त्याचे मित्र गावी आले.
विवाहाचा दिवस उजाडला. सत्तूच्या दारातच लग्नमंडप उभारला होता. वधूकडची मंडळी आली होती. मांडवात धामधूम सुरू होती. मुलांचा गोंधळ सुरू होता. कुरवल्यांची पळापळ सुरू होती. भावकी मंडळी, सगेसोयरे आणि मित्रमंडळी आसनस्थ झाली होती. अक्षताची वेळ जवळ आली होती, पण साहेब अजूनही आले नव्हते. सर्वांचे डोळे त्यांच्या वाटेकडं लागले होते. सत्तूला शंभर टक्के खात्री होती. तो स्वत:लाच सांगत होता, “साहेब येणार म्हणजे येणारच.’ कारण सत्तू हा नुसता जवळचा नव्हता, तर विश्वासालता कार्यकर्ता होता.
सत्तू विचार करत होता. बराच वेळ गेला. अक्षताची वेळही निघून गेली. लोकांची चुळबूळ सुरू झाली. मांडवात गलका वाढला. “कुठवर वाट बघायची? नक्की येणार आहेत, एवढाच निरोप आहे. किती वेळ लागणार, काहीच अंदाज नाही.’ लोकं बोलत होती. शेवटी कुणीतरी पुढाकार घेतला आणि सत्तूची समजूत काढली. “साहेबांना काहीतरी मोठी अडचण असणार. त्याशिवाय त्यांना वेळ लागणार नाही. आपण अक्षता टाकून घेऊ.’ ना नू करत सत्तूनं होकार दिला. मग अक्षताला सुरुवात झाली.
तांदूळ पडले. तांदळाच्या मुहुर्ताला साहेब आलेच नाहीत.
साहेब चार वाजता आले. साहेबांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले आणि म्हणाले, “अचानक दौरा ठरला. जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री येणार होते. त्यांना भेटणं आवश्यक होतं. मतदारसंघातली बरीच कामं त्यांना सांगायची होती. त्या दौऱ्यातून वेळच मिळाला नाही. सकाळपासून खूप प्रयत्न केला, पण वेळेत येऊ शकलो नाही.’ साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली आणि पुन्हा म्हणाले, “नाहीतर इतक्या जवळच्या कार्यकर्त्याचं लग्नं चुकवून कसं चालंल? पण माझा नाईलाज झाला. मी खरंच पुन्हा एकदा मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.’
साहेबांचं बोलणं ऐकून सत्तू सद्गदित झाला. सत्तूला भरून आलं. त्याची सगळी निराशा कुठल्या कुठं निघून गेली.
दिवस असेच जात होते. एक संपली, की दुसरी निवडणूक येत होती. सत्तूच्या मागचं काम संपत नव्हतं. रोज कुणाचं तरी भांडण, त्यामुळं रोज पोलीस स्टेशन किंवा तहसीलदार कार्यालयात दिवसातून दोन-दोन वेळा जावं लागायचं. कुणाचं रेशनिंग कार्ड, तर कुणाचा जातीचा दाखला. सत्तूला जेवायलाही वेळ मिळत नव्हता. मग घरासाठी आणि शेतीसाठी वेळ मिळणं तर दूरच राहिलं.
आता सत्तूचे वडील थकले होते. त्यांना शेतातली कामं होत नव्हती. लागवड, बी बेवळा आणायला पैसे पण नसायचे. बरीचशी शेती पडीक पडली होती. दोन एकर द्राक्षबाग काढून टाकावी लागली. सोसायटी वाढतच होती. डीसीसी बॅंकेचं दीर्घ मुदतीचं कर्जही थकलं होतं. सत्तूला दोन मुलं झाली. घरी थकलेले वडील. आजारी आई. दोन मुलांचा शाळेचा खर्च. कधीकधी तर सत्तूला खूप टेंशन यायचं, पण नडत नव्हतं. साहेबांच्या शब्दानं कर्जं मिळत होती. नव्या कर्जातून जुनं कर्ज फेडलं जात होतं. वेळ निघून जात होती. वसुलीला पर्याय निघत होता, पण डोक्यावर कर्जाचा बोजा वाढतच चालला होता. “कधी ना कधी कर्ज फिटंल आणि चांगले दिवस येतील’, असं सत्तूला वाटत होतं.
अंगावर कर्ज असलं, तरी सत्तूचं गावात वजन होतं. कुठलाच कार्यक्रम सत्तूच्या उपस्थितीशिवाय होत नव्हता. प्रत्येक लग्नकार्यात सत्तूच्या नावाचा पुकारा व्हायचा. स्वागत व्हायचं. गावात कोण व्यक्ती मयत झाली, तर सत्तू सर्वांच्या पुढं असायचा. तिथंही पहिली श्रद्धांजली सत्तूचीच असायची. जाईल त्या कार्यक्रमात सत्तूला मान असायचा. आयुष्यात अजून काय मिळवायचंय? ही जोडलेली माणसं, मान, प्रतिष्ठा. अशावेळी शिक्षण अर्धवट सोडल्याचा निर्णय योग्य होता, असं सत्तूला वाटायचं.
सत्तूचे वर्गमित्र शिकून मुंबई-पुण्याला गेले होते आणि तिकडंच स्थायिक झाले होते. काहींनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता, तर काहींनी नोकऱ्या धरल्या होत्या. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या. पुण्याला फ्लॅट. पोरं कॉन्वेंटला. ते इनोव्हा गाड्या घेऊन गावाकडं यायचे. पण गावी आलं, की ते सत्तूला भेटायचे. नमस्कार करायचे आणि काही काम असंल तर म्हणायचे, “आमच्या बदलीचं तेवढं साहेबांना बोला. तुमच्या शब्दाला मान आहे. तुमचं वजन आहे.’ तेव्हा सत्तूची छाती फुगायची आणि “सर, नोकरी करण्यापेक्षा मी नोकरी देणारा होणार आहे’, प्राचार्य सरांना बोललेले त्याचेच शब्द त्याला आठवायचे.
झेडपीची निवडणूक तोंडावर आली होती. आता मात्र साहेब शंभर टक्के आपल्याला बोलावून घेणार. जागा ओपनच होती. कुठलीच अडचण नव्हती. सत्तूच्या तिकिटाचं जवळजवळ फायनल झालं होतं. गेल्यावेळी सत्तूच्या तोंडचा घास गेला होता. आता मात्र संधी चालून आली होती. फक्त साहेबांच्या तोंडून येणं बाकी होतं. साहेबांची कामाची एक पद्धत होती. ज्या उमेदवाराला तिकीट द्यायचंय, त्याला ते मुंबईला बोलावून घेत. तिथं त्याचं तिकीट फायनल व्हायचं. सत्तू साहेबांच्या निरोपाची वाटच पाहात होता.
अचानक एके दिवशी साहेबांनी सत्तूला मुंबईला बोलावलं. सत्तूला खूप बरं वाटलं. आपल्या कष्टाचं चीज झालं. आपण पक्षासाठी आणि साहेबांच्यासाठी पळालो. त्याची साहेबांनी किंमत केली. साहेबांचा निरोप म्हणजे तिकिटाचं पक्कं काम झालं. तिकीट मिळालं, की निवडून येण्याचा विषयच नव्हता. शिवाय सत्तूची तेवढी लोकप्रियताही होती.
सत्तू लगेच मुंबईला रवाना झाला. सोबत काही मित्र आणि काही कार्यकर्ते होते.
मित्र आणि कार्यकर्त्यांसह सत्तू साहेबांच्या एसी चेंबरमध्ये शिरला. साहेबांनी चहा, नाश्ता मागवला आणि झेडपीचा विषय काढला. साहेब बोलू लागले, “यावेळी खूप टफ निवडणूक आहे. नानांच्या गटानं खूपच उचल खाल्लीय. आपल्याला तगडा उमेदवार पाहिजे. खरं तर सत्तूचाच नंबर आहे, पण पैशांचा प्रश्न आहे. पक्ष आणि मी आहेच. पण उमेदवारानं स्वतः पंधरा-वीस लाख घातले पाहिजेत. सत्तूची तेवढी परिस्थिती नाही. म्हणून एवढ्यावेळी सत्तूनं गप्प बसावं. पक्षाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. माझ्याही अस्तित्वाचा सवाल आहे. सत्तूला मार्केट कमिटीचा सदस्य केलेलाच आहे. सहा महिन्यांत चेअरमन करू, या आणि पुढच्या झेडपीला सत्तूचाच नंबर असणार. माझा शब्द आहे.’
साहेबांचं खरं होतं. आजकाल पैशांशिवाय निवडणूक होत नाही. पुढच्या झेडपीला आपणच अध्यक्ष असणार. साहेबांनी शब्द दिलाय. कसलं का असंना, पण एखादंतरी मार्केट कमिटीचं पद आपल्याला दिलंच आहे. सत्तूनं स्वतःचं समाधान करून घेतलं.
सत्तूच्या जागी सचिनराव उभे राहिले. गावाकडं येऊन कार्यकर्ते प्रचाराला लागले. सत्तूनं पायाला भिंगरी बांधली. घरदार, बायका पोरं विसरून कामाला लागला. डोळ्यात तेल घालून रात्री जागून काढल्या. तीन-तीन वेळा मतदार याद्या चाळून पाहिल्या. प्रत्येक मताला महत्त्व होतं. नेहमीप्रमाणंच त्यानं मतदान वाढवण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग केलं. सचिनराव तीन हजार मतांनी निवडून आले.
दिवस असेच जात होते. सत्तूची पोरं आता मोठी झाली होती. गेल्या वर्षी वडील गेले. घर पोरकं झालं. आता तर घरी कमावतं कुणीच राहिलं नाही.
धाकटा पोरगा कॉलेजला होता. थोरला पोरगा नाशिकला प्रायव्हेट जॉब करत होता. त्यालाही “गव्हर्मेंटमध्ये चिकटवणार’, असा साहेबांनी शब्द दिला होता.
डीसीसी बॅंकेचं कर्ज दुप्पट झालं होतं. शिल्लक राहिलेला ऊस तुऱ्यात येऊन त्याचा कडबा झाला होता. पैसा येण्याचे सर्व मार्ग संपले होते. घरावर गरिबीची अवकळा पसरलेली; पण एकदा पोरं नोकरीला लागली, की महिन्याला लाखभर रुपये येतील. कर्ज काय डाव्या हाताचा मळ. लगेच फिटून जाईल. मग बायकोला चार दागिने घेता येतील. उसाची डागडुजी करता येईल. बागपण वाढवता येईल. शिवाय येणाऱ्या निवडणुकीत आपणच अध्यक्ष. साहेबांनी शब्द दिलाय. साहेब विचार करणारच. हयात घालवली पक्षात. आता कल्ले पांढरे झाले. टक्कल पडलं. कार्यकर्ते विचारतात. सत्तू तात्या तब्येत कशी आहे? वय झाल्यासारखं वाटतंय. ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून तरी साहेब नक्कीच तिकीट देणार. सत्तू अजूनही आशा बाळगून होता.
अलीकडं साहेबांचे चिरंजीव पण राजकारणात उतरले आहेत, पण साहेब त्यांच्यावर नाराज आहेत; शिवाय साहेब घराणेशाहीच्याही विरोधात आहेत.
धाकलेसाहेब अलीकडं प्रत्येक कार्यक्रमात येतात. भाषण करतात. गरिबांची सेवा करणारं आमचं घराणं आहे, असं म्हणतात. आमदार साहेबांचे चिरंजीव म्हणून त्यांना लोक प्रचंड मान देतात. त्यांच्या भाषणांना टाळ्या कडाडतात. कुणाचं काम असंल, तर डायरेक्ट मंत्र्याला फोन करतात. त्यांच्याबरोबर नेहमी दहा-वीस कार्यकर्ते असतात.
वर्षभरातच झेडपीची निवडणूक जाहीर झाली. अध्यक्षपदासाठी सत्तूच अग्रेसर होता. ज्येष्ठ म्हणून, एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून. साहेबांनीही शब्द दिला होता. धाकल्या साहेबांना अजून पोच नाही. त्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे, पण साहेबांचाच विरोध आहे. घराणेशाही साहेबांनाच नकोय. साहेब तसे पुरोगामी विचारांचे आहेत.
एके दिवशी साहेबांनी सत्तूला बोलावलं. सत्तू गेला. त्याच्याबरोबर त्याचे दोस्त होतेच. सत्तूनं दालनात प्रवेश केला. साहेब चिंताग्रस्त चेहरा करून बसले होते. थोडावेळ काहीच बोलले नाहीत. नंतर म्हणाले, “सत्तू, आपलेच दात आणि आपलेच ओठ. काय करायचं? कुणाला बोलायचं?’
सत्तू म्हणाला, “नक्की काय घडलंय साहेब? सत्तू असताना तुम्ही असं चिंताग्रस्त का?’
तेव्हा साहेब म्हणाले, “मी गेले चार दिवस प्रयत्न करतोय, पण चिरंजीव ऐकायला तयार नाहीत. मलाच तिकीट हवं, म्हणून हट्ट करून बसलेत. पण मला चिरंजीवांपेक्षा सत्तू कार्यकर्ता जवळचा आहे. ज्यानं माझ्यासाठी उभी हयात घालवली, त्याला आम्ही विसरणार नाही. पण चिरंजीव ऐकत नाहीत. आम्ही काय करावं? तू म्हणशील तसं करू. भले चिरंजीव आमच्यापासून दूर गेले तरी चालतील.’
साहेब भावनाविवश झाले. साहेबांची अवस्था बघून सत्तूला भरून आलं. सत्तूनं साहेबांना ठामपणे सांगितलं,
“धाकल्या साहेबांचा अर्ज भरा. घरातच फाटाफूट नको. आम्ही पक्षासाठी एवढे दिवस राबलो. आता साहेबांच्या घराण्यासाठी राबलो म्हणून काय झालं?’
साहेबांनी सत्तूला जवळ घेतलं. पाठीवर शाबासकीची थाप मारली. सत्तू आणि त्याच्या बरोबरच्या सर्व कार्यकर्त्यांची “ताज’ हॉटेलला सोय केली. सर्व कार्यकर्ते ताजला रवाना झाले. तिथं त्यांनी आंघोळी केल्या. नंतर जेवण केलं. तोपर्यंत रेल्वेचं तिकीट घेऊन शिपाई आला. साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांची गावाकडं जाण्याची रेल्वेच्या फर्स्ट क्लासनं व्यवस्था केली होती.
रात्री रेल्वेनं कार्यकर्ते आणि सत्तू गावाकडं निघाले, पण सत्तूबरोबर आलेले कार्यकर्ते नाराज होते. ते सत्तूला म्हणाले, की “किती दिवस असं चालणार? आयुष्यभर कार्यकर्ता म्हणूनच राहणार का? तुम्ही काय ठरवलंय सत्तू तात्या? तुम्ही जागेवरच साहेबांना विचारायला पाहिजे होतं, की जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून चिरंजीवाला तिकीट मिळतेच कशी?’ सत्तू त्यावर काहीच बोलला नाही.
रेल्वे सुसाट चाललेली. रुळाच्या बाजूचे लाईटचे पुंजके वेगात मागं सरकत होते. गार वारा सुटला होता. सत्तू खिडकीशेजारी बसला होता. खिडकीतून तो बाहेर पाहात होता. सत्तूला उदास वाटत होतं. मित्र बोलत होते, त्यातही तथ्य होतं.
“उभी हयात राजकारणात घालवली. साहेबांशी एकनिष्ठ राहिलो. आयुष्यात दुसऱ्या पक्षाचा आणि दुसऱ्या साहेबांचा कधी विचार केला नाही. घरात बापाच्या जागी साहेबांचा फोटो लावला. राजकारणामुळं घराकडं दुर्लक्ष झालं. बागा गेल्या. शेती संपली. घरदार उद्ध्वस्त झालं. बापाच्या खांद्यावरची कुदळ आयुष्यभर सुटली नाही. शेतातल्या जनावरासारखा तो राबतच राहिला. शेवटी पोरगा निवडून येणार, या आशेवर बाप मरून गेला. बायका-पोरं देशोधडीला लागली. बरोबरीचे वर्गमित्र कुठल्या कुठं गेले. कोण आयएएस झाला, तर कोण पोलीस अधिकारी झाला. आपण मात्र साहेबांचे खंदे समर्थक, विश्वासू साथीदार, निष्ठावंत कार्यकर्ताच राहिलो. “घरात नाही ज्वारीचा दाणा आणि पुढारी उताणा’, अशी आपली अवस्था. उद्या पोरांनी विचारलं, तर बापाचं कर्तव्य काय सांगायचं? कॉलेज केलं असतं, तर आज क्लास वन ऑफिसर झालो असतो, पण त्यावेळी आपण प्राचार्यांचं ऐकलं नाही. आई-बापाचं ऐकलं नाही.
राजकारणाच्या नशेत पळतच राहिलो. आता दात काढून टाकलेल्या नागासारखी अवस्था झालीय. एकेकाळी निखारा होतो, पण त्याचा कोळसा कधी झाला हे कळलंच नाही.’ विचार करून करून सत्तूचं डोकं गरगरायला लागला.
रात्री उशिरा सत्तू घरी आला. त्या रात्री त्याला झोप अशी लागलीच नाही. रात्रभर नुसती तळमळ तळमळ. या कुशीवरून त्या कुशीवर. पहाटं कधीतरी त्याचा डोळा लागला.
सकाळी उशिरा जाग आली, ती धाकल्या साहेबांच्या हाकेनं. सत्तूला भेटण्यासाठी धाकले साहेब आले होते. सत्तू जागा होऊन बाहेर आला. धाकल्या साहेबांनी सत्तूचे पाय धरले आणि म्हणाले,
“तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, म्हणूनच राजकारणात आमच्या घराण्याचं नाव आहे. आमदार साहेब तुम्हाला लय नावजत होते. तुमचा वट आणि ताकद. तुमची मैदानातली धडाडती तोफ. अफाट वक्तृत्व. संघटन कौशल्य. संयमी संघर्ष. साहेबांच्या वरची निष्ठा. आमच्या घराण्यावरचं तुमचं प्रेम. साहेब बरंच काही सांगत होते. आता आमचं निवडून येणं तुमच्याच हातात आहे.’ असं म्हणत धाकल्या साहेबांनी पुन्हा एकदा सत्तूचे पाय धरले. सत्तूनं त्यांना उठवलं आणि आलिंगन दिलं. धाकल्या साहेबांना आश्वासन देत सत्तू म्हणाला,
“निवडून येण्याची काळजी करू नका. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी.’
धाकल्या साहेबांच्या प्रचारासाठी सत्तू नावाचा कार्यकर्ता कामाला लागला.
त्यानं पुन्हा पायाला भिंगरी बांधली!