मुंबई – गुरुवारी निवडणूक आयोगात पार पडलेल्या सुनावणीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग आमचे मुद्दे ग्राह्य धरेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
पाटील म्हणाले की, आमचे सर्व मुद्दे कागदावर आहेत. विरोधी गटाने 10 वर्षांच्या मुलांचे, झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे, गृहिणींचे एफिडेविट दिले आहेत. जिल्ह्यात 32 जिल्हाध्यक्ष म्हणून एफिडेवीट दिले आहे. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही. ज्यांना एफिडेविट कशासाठी देतो हे ही माहिती नाही असे एफिडेविट दिले आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर आहे आणि निवडणूक आयोग ही बाब लक्षात ठेवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. बहुसंख्य आमदार कुठे जातात त्याच्या मागे पक्ष जातो असे नाही. तर बहुसंख्य कॅडर कुठे आहे यावर पक्ष अवलंबून आहे. सुप्रीम कोर्टाने यावर स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे मला वाटत नाही की सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून निर्णय दिला जाईल पण दिलाच तर पुढची पायरी आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकारमध्ये असलेल्या मतभेदांवर भाष्य करताना पाटील म्हणाले की, सरकारमधील काही लोक ओबीसींना चुचकारत आहेत तर काही मराठ्यांना चुचकारत आहेत. सरकारचा दोन्ही दरडींवर पाय ठेवण्याचा विचार असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की तुम्ही एकाठिकाणी बसा आणि याबाबत योग्य निर्णय करा. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही पण मराठा आरक्षणाबाबत काय करणार, ओबीसींचे काय करणार, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. जे अतिशय महत्वाच्या पदांवर ते दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत नाही, त्यांनी ही बोलले पाहिजे.
महाराष्ट्र गुंतवणुकीत चौथ्या क्रमांकावर
महाराष्ट्र गुंतवणुकीत चौथ्या क्रमांकावर गेला आहे. सरकार इव्हेंट करण्यात इतके मशगुल आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडे वेळ नाही. गुंतवणूक यावी यासाठीचे सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत. बेरोजगारीचा दर 10.9 इतका झाला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.