खा. रणजितसिंह यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
सातारा – महाराष्ट्रात सर्वत्रच अवकाळी पावसाने थैमान घातले असून त्यामधून माढा मतदारसंघातील दुष्काळी तालुकेही सुटलेले नाहीत. त्यामुळे पिके कुजून जाऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्याची आणि विमा कंपन्यांकडून मदत मिळवून देण्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना देण्याची मागणी करणारे निवेदन दिले.
फलटण, माण व खटाव या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून खा. रणजितसिंह यांनी लोकांना दिलासा देण्याचे काम केले; परंतु काही खोडसाळ लोकांनी सोशल मीडियावर खा. रणजितसिंह यांची पोस्ट व्हायरल करून चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असताना खा. रणजितसिंह यांनी स्वतःच्या खिशातून 25 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली होती. त्याचबरोबर वस्तूरूपात 25 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली होती.
मतदारसंघातील पंढरपूर, सांगोला, माढा, करमाळा, माण, फलटण, माळशिरस या भागात शेतीच्या बांधावर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केली होती. गारपीट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माढा विधानसभा मतदासंघातील अनेक गावांमध्ये लाखो रुपयांची मदत केली होती. खासदार झाल्यापासून नीरा-देवघरचा पाण्याचा प्रश्न सोडवून उजनी व नीरा उजवा कालव्यांमधील जल व्यवस्थापन पाटबंधारे विभागाला करायच्या सक्त सूचना दिल्या होत्या.
फलटण-लोणंद रेल्वेसेवा, पंढरपूर पालखी मार्गावरील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला म्हणून बाराशे कोटी रुपयांची मंजुरी, शिरवळ-लोणंद रस्त्यासाठी निधी, सांगोला तालुक्यात दुष्काळी भागांमध्ये जनावरांसाठी छावण्या, कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी एवढी कामे केली तरी काही अल्पसंतुष्ट लोक चुकीच्या पोस्ट व्हायरल करून त्यांच्या बदनामीचा प्रयत्न करत आहेत. ते लवकरच पुन्हा मतदारसंघाचा पाहणी दौरा करणार असून त्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत, असे भाजप नेते जयकुमार शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.