आळंदी -शहरात बुधवारी (दि. 22) तीन जणांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान, शहरात आतापर्यंत 71 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 30 जणांनी करोनावर मात करीत घरी परतले असून 40 जणांवर उपचार सुरू आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
करोना संसर्ग रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासन, आरोग्य, पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर करोनाची साखळी तोडण्यासाठी आळंदी परिसरात संचारबंदी लावण्यात आली आहे. त्याचे काटेकोरपण पालन करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले.
स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणा समन्वय पूर्वक काम करत आहे. करोनामुक्तीसाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, गर्दी टाळणे या नियमांचे पालन करून स्वत:सह इतरांच्या जीवीताची काळजी घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले.