फुरसुंगी – फुरसुंगी-उरुळी देवाची ग्रामस्थांनी कचरा डेपोवर आंदोलन करीत शहरातून आलेल्या कचऱ्याच्या महानगरपालिकेच्या गाड्या अडवून त्या परत पाठविल्या. या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर दोनच दिवसात शहराचा उकीरडा होण्यास वेळ लागणार नाही. करोना फोफावत असतानाच पालिकेपुढे आता कचरा प्रश्नाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
फुरसुंगी-उरूळी देवाची येथे दोन महिन्यापूर्वी कचरा डेपो बंद आंदोलनावेळी ग्रामस्थांनी करोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आंदोलन मागे घेतले होते. एप्रिल अखेरपर्यंत 400 मेट्रिक टन कचरा बायोमायनिंग प्रकल्पात आणण्यास सशर्त परवानगी दिली होती.
परंतु, पालिकेने या प्रकल्पात कचरा न टाकता राजरोजपणे ओपन डंपिंग केले. राष्ट्रीय हरीत लवादाने फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोत यापुढे कोणताही नविन प्रकल्प उभारु नयेत, असे स्पष्ट आदेश दिलेले असताना या आदेशाचा अवमान करत पालिकेने कचरा डेपोत परस्पर 200 मेट्रीक टन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरु केल्याने ग्रामस्थांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे. कोणत्याही परिस्थितीत फुरसुंगी-उरुळी देवाची येथे ओपन डंपिंग किंवा नविन प्रक्रिया प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार करत आजपासून (दि.22) पालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या अडवून त्या परत पाठविण्यात आल्या. हे आंदोलन बेमुदत सुरू राहणार आहे.
याबाबत कचरा डेपो संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे म्हणाले की, गेल्या आंदोलनाच्यावेळी ग्रामस्थांनी करोना महामारीची भयानक परिस्थिती पाहता सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत आंदोलन मागे घेतले होते. करोनाची गंभीर परिस्थिती पाहता ग्रामस्थांनी सहकार्याची भुमिका घेत तीन महिने उलटले तरी आडकाठी न आणता पालिकेला कचरा टाकू दिला. परंतु, पालिका प्रशासन आमच्या चांगुलपणाचा गैरफायदाच घेत असल्याचे दिसुन येत आहे. पालिकेने 200 मेट्रीक टन कचरा प्रकल्पाचे काम सुरु केले आहे, ही ग्रामस्थांची फसवणूक व न्यायालयाच्या आदेशाचा अवमानच आहे. याठिकाणी विविध प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी 31 डिसेंबर 2019ची अंतिम मुदत दिली होती. ही मुदत उलटली तरी आजपर्यंत याठिकाणी 400 मेट्रीक टन कचरा येत आहे. त्यामुळे आता येथे नविन प्रकल्प आणुन पुन्हा आमच्या माथी कचरा मारु नये. कोणत्याही परिस्थितीत येथे ओपन डंपिंग व कचरा प्रकल्प होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांसह कचरा डेपो हटाव संघर्ष समितीने केला आहे.
पालिका प्रशासन प्रत्येक वेळी ग्रामस्थांची दिशाभूल करुन आपल्या चुका झाकण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या आंदोलनावेळी पालिकाआयुक्त, महापौर, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत करोनाच्या पार्श्वभुमीवर एप्रिल अखेरपर्यंत बायोमायनिंगसाठी 400 टन कचऱ्याला परवानगी दिली होती. ही मुदत संपली तरी ग्रामस्थांनी काहीही हरकत घेतली नव्हती. परंतु, पालिकेकडुन डेपोत नविन कचरा प्रकल्प उभारणी व ओपन डंपिंग सुरु केल्याने पालिका सतत ग्रामस्थांची फसवणूक करत असल्याने बेमुदत कचरा डेपो बंद आंदोलन ग्रामस्थांनी केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.