३ लाख ३१ हजार व्यक्ती क्वारंटाईन, ४ कोटी १० लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई – लाकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख ५६ हजार २३२ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ३ लाख ३१ हजार १५१ व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १४मे या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ०७ हजार २५६ गुन्हे नोंद झाले असून २० हजार २३७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी १० लाख ७९ हजार ४९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊन च्या काळात या फोनवर ९१ हजार ७९० फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६७२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ३ लाख ३१ हजार १५१ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३०४ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५७ हजार ६७० वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
रिलिफ कॅम्प….
राज्यात एकूण ३९३२ रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३ लाख ७४ हजार ४५६ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका….
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. या काळात विविध प्रकारच्या अफवा पसरत आहेत त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे,असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.