माजी हवाईदल प्रमुख बी.एस.धनोआ यांची धक्कादायक माहिती
नवी दिल्ली : देशाला हादरुन सोडणाऱ्या मुंबई हल्ल्याच्या बाबतीत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबईवर झालेल्याहल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज झाले होते. तसा प्रस्ताव देखील हवाई दलाकडून तत्कालिन युपीए सरकारसमोर सादर करण्यात आला होता मात्र, पाकिस्तानवर हल्ला करण्याचा हवाई दलाचा प्रस्ताव तत्कालिन सरकारने फेटाळला, असा धक्कादायक खुलासा माजी हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी केला आहे.
मुंबईत एका महाविद्यालयाच्या वार्षिक समारंभात ते बोलत होते. यावेळी धनोआ यांनी, पाकिस्तानात कुठल्या ठिकाणी दहशतवादी कॅंप आहेत, हे आम्हाला माहिती होते आणि आम्ही कारवाईसाठी तयार होतो. मात्र, या दहशतवादी कॅंपवर हल्ला करायचा की नाही हा राजकीय निर्णय होता. त्यानुसार सरकारने हल्ल्याचा आमचा प्रस्ताव नाकारला. धनोआ हे 31 डिसेंबर 2016 ते 30 सप्टेंबर 2019 या काळात हवाई दलाचे प्रमुख होते.
डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतरही हवाई दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ल्यांद्वारे प्रतिकारवाई करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, हा प्रस्ताव स्विकारण्यात आला नाही. भारतात अशांतता आणि दहशतवाद पसरवणे ही पाकिस्तानची दोन हत्यारं आहेत. त्यामुळे जर भारतात शांतता प्रस्थापित झाली तर पाकिस्तान आपले अनेक विशेषाधिकार गमावून बसेल. त्यामुळेच पाकिस्तान काश्मीरमध्ये अशांतता कायम ठेऊ इच्छितो.
पाकिस्तान भारताविरोधात आपला हेतू साध्य करण्याच्या कामात गुंतला आहे. त्यामुळे यापुढेही हा देश भारतावर असेच हल्ले करत राहणार आहे. मात्र, एखाद्या छोट्या किंवा मोठ्या कोणत्याही हल्ल्यासाठी हवाई दल सज्ज असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. भारताची शेजारील दोन राष्ट्रे अण्वस्र संपन्न असल्याने भारतासमोर सर्वात मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.