शिरूर – गुजरात वाफी, पुणे, मुंबई, करमाळा व इतर ठिकाणाहून गुपचूप शिरूर शहरात प्रवेश करणाऱ्या 21 नागरिकांची माहिती मिळाल्यावर शिरुर नगर परिषद व शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाइन केले असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयाची नजर राहणार असल्याचे शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
शिरूर शहरात रात्रीच्या वेळेस अनेकदा शिरूर शहरात नागरिक गुपचूप प्रवेश करीत असल्याची बातमी दैनिक प्रभातमध्ये प्रसिद्ध केली होती. यावर कालपर्यंत शिरूर शहरात गुपचूप प्रवेश करणारे 21 नागरिक आढळले असून, या सर्व नागरिकांना क्वारंटाइन केले आहे. हे नागरिक गुजरात राज्यातील वाफी, पुणे, मुंबई, करमाळा व इतर ठिकाणाहून शहरात आले आहेत.
याची माहिती मिळाल्यानंतर शिरूर नगरपरिषदेच्या वतीने माहिती घेऊन काल पाच लोकांना तर आज सोळा लोकांना नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने आरक्षित केलेल्या विविध ठिकाणी क्वारंटाइन केले. हायरिस्क परिसरातून येणाऱ्या नागरिकांकडून शिरूर शहरातील नागरिकांना ही करोना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडे कुठल्याही नातेवाईक, पाहुण्यांना बोलवू नये. हे कोणी आपल्याकडे आले तर त्याची माहिती त्वरित द्यावी.
माहिती लपवणाऱ्यांवर कडक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिला आहे. मंगळवारी मुंबईवरून काही लोक शहरातील एका नागरिकाकडे आले होते. अशा एका नागरिकावर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचेही रोकडे यांनी सांगितले.
शिरूर शहरात पुणे येथून आलेल्या तिघाजणांना औंध हॉस्पिटल पुणे येथे करोना संसर्ग तपासणीसाठी पाठवले होते; परंतु त्यांच्यात लक्षणे आढळत नसल्याने त्यांची तपासणी झाली नसून त्यांना पुन्हा शिरूर येथे पाठवले आहे.त्यांनाही क्वारंटाइन केले आहे.
भाजी, फळबाजार बंद
शिरूर शहरात सोशल डिस्टन्सिंगबाबत अनेक वेळा सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने, तसेच तहसीलदार लैला शेख यांनी दिलेल्या आदेशानुसार शिरुर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भरवण्यात येणारा भाजीपाला व फळे विक्री बाजार उद्यापासून (दि. 30) बंद करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. शहरात पुणे, मुंबई व इतर करोना संसर्ग बाधित क्षेत्रातून भाजीपाला, फळे व भुसार मालाची वाहतूक करून पुन्हा शहरात येणारे नागरिक, व्यापारी यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे.
शिरूर शहरात मोठ्या संख्येने करोना व्हायरस बाधित क्षेत्रातून नागरिक येत आहेत. यामुळे शिरूर शहराला संसर्ग होण्याची भीती दिसून येत आहे. यासाठी नागरिकांनी जागृत राहणे गरजेचे आहे. शहरात आलेल्या नागरिकांची माहिती त्वरित प्रशासनाला देणे गरजेचे आहे.
तुषार पाटील,
वैद्यकीय अधीक्षक शिरूर ग्रामीण रुग्णालय