मुंबई: निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या नागरिकांच्या खात्यात सोमवारपासून 20 हजार रुपये जमा होतील, अशी माहिती मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. या चक्रीवादळात नुकसान झालेल्यांचे पंचनामे करण्यात येत असून सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांना करोनाची बाधा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आखाडा या कार्यक्रमात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, मंत्र्यांचा सामाजिक वावर, चक्रीवादळाने झालेले नुकसान, त्यादरम्यान केलेली पाहणी आणि मंत्र्यांचा लोकांशी येणारा संपर्क या अनुषंगाने चर्चा झाली. कोकणात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली.
विजय वडेट्टीवार म्हणाले, आम्ही कोकण दौऱ्यावरून आल्यानंतर एनडीआरएफचे मदतीचे जे निकष होते, ते आम्ही लगेच बदलले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली की नुकसानग्रस्तांच्या खात्यावर तातडीने 10 हजार टाकले पाहिजे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, सोमवारपासून 20 हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हे पैसे रोख स्वरूपात आहेत. अन्य मदत ही जसे निर्णय झालेत त्यानुसार होईल. पण सोमवारपासून थेट खात्यावर रोख रक्कम जमा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
विरोधी पक्षाच्याही काही सूचना असतात, ते लक्षात घेऊनही निर्णय होतात. माझ्या खात्यामार्फत काही निर्णय घ्यावे लागतात आणि अशा परिस्थितीत मदत ही करावीच लागते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळात कोकण अक्षरश: उद्ध्वस्त झाले असून घरं, असंख्य झाडे पडली आहेत. कोकणला पुन्हा उभं करण्यासाठी राज्य सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडचा दौरा करून तातडीने 100 कोटी, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला 25 कोटी रुपये जाहीर केले आहेत.