मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक गोष्टी सुरु केल्या आहेत. मात्र शाळा कधी सुरु होणार हा राज्यातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडला आहे. योग्य ती खबरदारी घेत राज्यात जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षण विभागाची तयारी आहे. शाळा कशा सुरू करता येतील यासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक तत्वे देखील तयार केली आहेत. आता केवळ या सर्वांना मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना सदर गावात कोरोनाचा एकही रुग्ण नसेल, याची खात्री करून शाळा सुरू होऊ शकणार. सरसकट शाळा सुरू होणार नाहीत. जिथे महिनाभरात एकही रुग्ण आढळला नाही तिथल्या नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू होऊ शकतात. सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरू होऊ शकतात. पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात. अकरावीचे वर्ग दहावीचे निकाल लागल्यानंतर आधी प्रवेश प्रक्रिया होणार. ती पूर्ण झाल्यावर वर्ग सुरू होऊ शकतात.
हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारत घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना असतील. एक दिवसआड शाळा भरवण्याची मुभा असणारा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शाळेचे निर्जंकीकरण करावे लागणार आहे. विद्यार्थी, शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.