कराड – कराड दक्षिणच्या डोंगरी भागात काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने विभागातील 200 हून अधिक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. भरेवाडी येथे जमीन खचली असून उंडाळे-जिंती रस्त्यावरील पूल नदीच्या प्रवाहामुळे खचला आहे. त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अतिवृष्टीने दक्षिण भागात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. कराड दक्षिणच्या डोंगरी भागात 1976 नंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शेती, घरे व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने विभागातील अनेक गावे संपर्कहीन झाली होती. गुरूवारी पाऊस कमी झाल्याने काही गावे पुन्हा संपर्कात आली आहेत.
दक्षिण विभागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. विभागात उंडाळे 4, तुळसण 15, साळशिरंबे 11, टाळगाव 5, सवादे 7, नांदगाव 7, जिंती 12, ओंड 22, सवादे 6, नांदगाव 5, अकाईवाडी 3, येणपे 2, माटेकरवाडी 7, लोहारवाडी 8, घोगाव 9, खोचरेवाडी 10, पाटीलमळा 3, ओंडोशी 4, थोरातमळा 4, भुरभूशी 2 तर येळगाव 30 पेक्षा अधिक घरांची पडझड झाली असून याचे पंचनामे तलाठी व मंडल अधिकारी यांनी केले आहेत.
उंडाळे-जिंती मार्गावर उंडाळे स्मशानभूमी जवळील पूल खचला असून या मार्गावरील वाहतूक बंद करुन ती उंडाळे-साळशिरंबे मार्गे वळविण्यात आली आहे. नांदगाव-मनू या मार्गावर हनुमान मंदिराजवळ रस्त्यात मोठे पिंपळाचे झाड पडल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ओंड रस्त्यावरील फरशी पुलावरून पाणी जाऊन हा पूल पूर्णपणे खचला आहे.
पुलावरचा संपूर्ण रस्ता वाहून गेला असून या पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दक्षिण मांड नदीला आलेल्या पुरामुळे टाळगाव येथील महादेव यलमारे, राजू यलमार, अशोक चव्हाण यांच्या घरात पाणी शिरून त्यांचे नुकसान झाले. दक्षिण मांड नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे जमीन खचली आहे. तर येवती तुळसण ओढ्याला पाणी आल्याने विभागातील विहिरी, पंप यासह शेतीचे नुकसान झाले असून विभागातील खरिपाची पिके अद्यापही पाण्याखालीच आहेत.