राजगुरूनगर/मंचर- करोनाचा सर्वाधिक फटका वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. एसटी महामंडळाच्या राजगुरूनगर आगाराचे गेल्या 10 दिवसांत सुमारे 20 लाखांचे उत्पन्न घटले असल्याची माहिती राजगुरुनगर एसटी आगाराचे प्रमुख रमेश हांडे यांनी दिली.
राजगुरूनगर एसटी आगाराच्या अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील मंचर,घोडेगाव तसेच खेड तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण, आळंदी ही महत्त्वाची बसस्थानके येतात. राजगुरूनगर एसटी आगाराचे 2 लाख रुपयांचे दैनंदिन उत्पन्न गेल्या 10 दिवसांपासून घटले आहे. दैनंदिन उत्पन्न 8 ते 10 लाख रुपये असायचे, अशी माहिती वाहतूक नियंत्रक तुकाराम पवळे यांनी दिली. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर एसटीच्या फेऱ्या पुर्ववत केल्या जातील, अशी माहिती आगारप्रमुख रमेश हांडे यांनी दिली.
दरम्यान, करोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात असल्याने पुणे येथे जाण्यासाठी प्रवासी नाही. तर पुणे येथून नाशिक, संगमनेर, नारायणगाव, मंचर, घोडेगाव, कोपरगाव, आळेफाटा आदी गावी जाण्यासाठी प्रवाशांची वाकडेवाडी-शिवाजीनगर बसस्थानकांत कायमच वर्दळ असते. लांब पल्ल्याच्या विशेषत: औरंगाबाद, पंढरपूर, नाशिक या एसटी गाड्या प्रवाशांच्या संख्येअभावी आणि शासनाच्या आदेशानुसार बंद ठेवल्या आहेत. तसेच काही स्थानिक लोकल फेऱ्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत. महाविद्यालयांना सुट्टी घोषित केल्या असल्याने शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसणार नसल्याने या फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत.