इंद्रायणी, पवना नद्यांवरील पूल पाण्याखालीच
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी 161 मि. मी. पाऊस
पवनानगर – मावळात शनिवारी सायंकाळपासून ते रविवारी दुपारपर्यंत पवन मावळमध्ये अतिवृष्टीमुळे मावळ जलमय झाले आहे. मावळातील जनजीवन अद्यापही विस्कळीत आहे. सोमवारी दिवसभरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरीही मावळातील धरणातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे मावळमधील सर्वच नद्या, ओढे-नाल्यांवरील सर्व पूल पाण्याखालीच आहेच. त्यामुळे सुमारे 125 गावांचा संपर्क अद्याप तुटलेलाच आहे. पवना धरणातून अजूनही 18 हजार 400 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मागील तीन दिवसांपासून पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी व रविवारी आपले रौद्ररूप धारण करत अतिवृष्टीला सुरुवात केली होती. ती रविवारी दुपारपर्यंत कायम होती. अतिवृष्टीमुळे पवन मावळसह संपूर्ण मावळ जलमय झाल्यामुळे जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी काही ठिकाणी पुराचे पाणी काही प्रमाणात कमी झालेले पहावयास मिळाले.
धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे पवना व इंद्रायणी नदीच्या पूरस्थिती कायम आहे. दोन्ही नदीवरील बहुतांश पूल अद्याप पाण्याखाली असल्याने परिसरातील अनेक गावांचा जनसंपर्क तुटलेलाच आहे. तसेच इंद्रायणी नदीवरील सांगिसे, वडिवळे पूल मागील दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता गेल्या 15 दिवसांपासून पाण्याखाली आहे.
या परिसरातील जनसंपर्क तुटलेलाच असल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पुराचा फटका या परिसरातील शालेय विद्यार्थी, कामगार व दुग्धव्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सोमवारी दिवसभर लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात अधूनमधून मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या. तर आज दिवसभर मुसळधार पावसाने पवन मावळाला झोडपले आहे. दिवसभरात पवना धरण क्षेत्रात सुमारे सायंकाळी सातपर्यंत 161 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. गेल्या 36 तासांत 308 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पवना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची सुरुवात असल्याने धरणातून अद्याप 18 हजार 500 क्युसेक इतका विसर्ग पवना नदीत सुरू असल्याने पवना नदीवरील ब्राम्हणोली, कोथुर्णे, शिवली, कडधे, थुगाव, बेबडओहोळ, धामणे हे सर्व पूल पाण्याखालीच आहे. तर इंद्रायणी नदीवरील सांगिसे, वाडिवळे, टाकवे, नाणे, आंबी हे पूल पाण्याखाली असल्याने या परिसरातील संपर्क तुटलेला आहे.
पवना धरण परिसरात संततधार पाऊस पडतच आहे, जर पाऊस असाच राहिला, तर धरणांतून विसर्ग वाढविण्यात येईल. दरम्यान, पवन मावळात प्रवेश करण्यासाठी गोडुंब्रे येथे असलेला पवना नदीवरील सर्वात मोठ्या पुलावरून दोन फूट पाणी वरून वाहू लागल्याने जवळपास 25-30 गावांचा संपर्क तुटला आहे. यापूर्वी कधीच हा पूल पाण्याखाली गेला नव्हता. या पुलावरून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करीत आहेत.