जगदीश देशमुख
तरुणांनो, खेड्याकडे चला असे सगळेच म्हणतात, पण का? याचे उत्तर कोणीच देत नाही. जोपर्यंत याचे उत्तर सापडत नाही, तोपर्यंत खेड्याकडे तरुण येणार नाही. रोजगार असेल तिथे लोकसंख्या वाढते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मग खेडेगावांमध्ये रोजगार वाढीसाठी किती योजना, उपक्रम, धोरण राबवले गेले? सर्वसामान्य नागरिकांनीही खेडे स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी काय प्रयत्न केले, तर त्याचे उत्तर “काहीच नाही’, असेच द्यावे लागते.
महात्मा गांधींनी “खेड्याकडे चला’ अशी घोषणा दिल्यापासून ते आजपर्यंत अनेक राजकारणी नेत्यांनी ती घोषणा वारंवार दिली आहे. तरी खेडी ओस का पडली आहेत? खेडी पूर्वीसारखी स्वयंपूर्ण व्हावीत, खेडी आणि शहरे यांचा समतोल राखला जावा यासाठी प्रत्यक्ष उपाययोजना करावी लागेल, तरच तरुण खेड्याकडे वळतील.
2011च्या जनगणनेनुसार देशातली 68.84 टक्के लोकसंख्या (83.31 कोटी) ही 6 लाख 40 हजार 867 गावांत राहते. उरलेली 32 टक्के लोकसंख्या ही शहरात राहते. मात्र, शहरात राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. शहर आणि खेडेगावातील लोकसंख्येच्या घनतेमध्ये कमालीची दरी निर्माण होत आहे. लोकसंख्येच्या घनतेची दरी कमी केल्याशिवाय आपला देश विकसित होणार नाही, देशातील राहणीमानाचा समतोल राखला जाणार नाही.
ब्रिटिशपूर्व काळात खेडी संपन्न होती. नंतर ती ओस का पडू लागली हे अगोदर पाहावे लागेल. ब्रिटिशपूर्व काळात गावगाडा कसा चालायचा तर अलुतेदार-बलुतेदार पद्धत प्रचलित होती.
वस्तुविनिमय पद्धत होती. त्यामुळे गावातील सर्व जातीधर्मांचे लोक एकमेकांवर विसंबून असायचे. म्हणून गावाचा एकोपा होता. श्रीमंत जमीनदार पिण्याचं पाणी मिळण्यासाठी तलाव किंवा सरोवर बांधत. त्यावेळी गावात मोठ्या सभा भरत आणि धर्माधारित कीर्तने आणि कथा सांगितल्या जात. यातून जनतेपर्यंत देश आणि जगभरातल्या बातम्या पोहोचत असत. लोक साक्षर आणि जागरूक होत असत. मग हे गावातील वातावरण कधीपासून बदलायला लागले. तर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर जमीनदारी नष्ट करण्यात आली. लोकशाही समाजव्यवस्था हे स्वतंत्र भारताचे ध्येय ठरले. त्यामुळे गावांत नवीन जागृती निर्माण झाली. पारंपरिक ग्रामसंस्था घुसळून निघाली.
खेडेगावातही पैसा येऊ लागला, अलुतेदार-बलुतेदार या पद्धती कालबाह्य झाल्या. त्यामुळे गावातील लोकांचे एकमेकांवर विसंबून राहण्याचे दिवस संपले. परिणामी गावातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी लोप पावली आणि येथूनच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली खेडे आणि शहरातील दरीला.
बरं मग ही खेडे आणि शहरातील दरी कमी होऊ शकत नाही का? तरुणांना खेड्याचे आकर्षण वाटू शकत नाही का? तर हे होऊ शकते. मग काय करावे लागेल, तर त्यासाठी अभ्यास समिती बसवायची गरज नाही किंवा परदेशातल्या एखाद्या खेड्याचा अभ्यास करण्यासाठी समिती पाठवण्याचीही गरज नाही. तरुणांनी खेड्याकडे जाण्यासाठी काय करावे लागेल, तर उत्तर अगदी सोपे आहे जे जे शहरात आहे ते ते खेड्यात घेऊन जायला लागेल. आज शहरातील प्लॅटफॉर्मवर शेंगदाणे विकणाऱ्याचे उत्पन्न हे खेडेगावातील किराणा मालाच्या दुकानदारापेक्षा जास्त आहे हा असमतोल संपायला हवा.
खेडी परिपूर्ण व्हावीत असं मनापासून वाटत असेल तर पायाभूत सुविधांपासून सुरुवात करावी लागेल. गावात खेळाची मैदानं असावीत. करमणुकीसाठी रेडिओ, दूरचित्रवाणी, नाट्यगृह, सिनेमागृह सर्वांना उपलब्ध असावीत. नियतकालिकं मिळण्याची सोय हवी. वाचनालयं असावीत. शेतीची धान्यपिकं, फळं-फुलं बागाईत आणि वृक्षांचं योग्य संवर्धन व्हावं. त्यांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावं. आरोग्य सुविधांची वानवा असता कामा नये. तालुका वा जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटल्स असावीत. ज्या ज्या पायाभूत सुविधा शहरात आहेत त्या त्या खेडेगावांमध्ये असाव्यात.
खेड्यातील तरुणाला उच्च शिक्षण घेण्यासाठीच मुळात शहरांमध्ये यावे लागते. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी तालुका वा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाच्या सोयी हव्यात.
उच्च शिक्षण घेतल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो तो रोजगाराचा. कुठल्याही क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणाला आज कुठल्या खेडेगावांमध्ये नोकरी मिळते का सांगा. खेड्यातील तरुणांनी फक्त शेतीच करायची का? त्याला नोकरीसाठी शहरातच यावे लागते. ह्या प्रश्नावर सगळ्यांनी मिळून काम केले आणि उत्तर शोधले तर 90 टक्के प्रश्न सुटतील आणि खेडीसुद्धा शहरांसारखी परिपूर्ण होतील.
राज्यातील शहरांचा भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर मोठ्या दोन शहरांमध्ये 300 ते 600 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर नाही आणि या किलोमीटरमध्येच सगळी खेडी वसली आहेत. मग एखादी एमआयडीसी किंवा आयटी पार्क मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये न वसवता ह्या मधल्या किलोमीटरमध्ये वसवली तर तिथे रोजगार निर्माण होईल आणि तरुण खेड्याकडे राहील. एक एमआयडीसी किंवा आयटी पार्क आले म्हणजे तिथे काम करणाऱ्या नोकरदार वर्गासोबतच ह्या वर्गाला सर्व्हिस देणारे अन्य अनेक रोजगार उपलब्ध होतात.
मुंबईतल्या धारावीत मातीची भांडी, खाण्याचे पदार्थ, हॉटेल व्यवसाय, बेकरी पदार्थ, चामड्याच्या वस्तू, रबर, इलेक्ट्रॉनिक सामान, हस्तकलेतून कपडे, एम्ब्रॉयडरी, साबण, मुलांची खेळणी, छपाई साहित्य, बॅगा, छत्र्या इत्यादी वस्तू बनवण्याचे जसे उद्योग आहेत, तसे काही उद्योग खेडेगावात निर्माण व्हायला पाहिजेत.
तरुणांनी खेडेगावाकडे चला यासाठी आवश्यक आहे ती मानसिकता बदलण्याची. मग ही मानसिकता असेल समाजाची, तरुणांची आणि खास करून तरुणींची. आज खेडेगावातल्या तरुणीही खेडेगावात राहायला तयार नाहीत. त्यांनाही लग्न शहरातल्या मुलासोबत करायचे आहे. ही मानसिकता जाऊन शहरातल्या तरुणीही जेव्हा म्हणतील, मला लग्नासाठी खेडेगावातला मुलगा पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने खेडेगावाचे दिवस पालटतील. यासाठी सगळ्यांनी मिळून अभियान राबवण्याची आवश्यकता आहे.
अलीकडच्या काळात हळूहळू का होईना पण समाजाची, तरुणांची, तरुणींची मानसिकता बदलते आहे. हे आशादायक चित्र आहे.