मुंबई : राज्यात लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते ३ मे या कालावधीत कलम १८८ नुसार ९२,१६१ गुन्हे दाखल झाले असून १८,२१६ व्यक्तींना अटक करण्यात आली. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ३२ लाख (३ कोटी ३२ लाख ) रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
पोलिसांवर हल्ला प्रकरणे…
दरम्यान, या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १७५ घटनांची नोंद झाली आहे. यात ६५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने काही पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सध्या ३५ पोलीस अधिकारी व ३५० पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्देवाने ३ पोलीस कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन झाले.