छत्रपती संभाजीनगर – मंदिरे (Temple) नेहमी भारतीयांच्या आस्थेचा विषय राहिली आहेत. विशेषत: देशातील मंदिरे धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे बनलेली आहेत. देशभरात असंख्य मंदिरे असून कोट्यवधी भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी जातात. या मंदिरांना मोठ्या प्रमाणात दानही प्राप्त होते. महाराष्ट्रातील प्रमुख 40 मंदिरांचा विचार केल्यास येथे दरवर्षी 1 हजार कोटींवर दान दिले जाते. यात एकट्या शिर्डीच्या (Shirdi saibaba) श्री साईबाबा मंदिराचा 400 कोटी म्हणजे 40 टक्क्यांवर वाटा आहे.
दुसरीकडे, दक्षिणेतही मंदिरांची संख्या मोठी असून येथे एकट्या तिरुपती बालाजी मंदिराला (Tirupati Balaji mandir) वर्षाकाठी 1500 कोटींवर दान प्राप्त होते. तिरुपतीच्या मंदिर ट्रस्टसह मीनाक्षी मंदिर, सबरीमाला मंदिरातही दर्शनाला देश-विदेशातून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. सामाजिक कार्यात त्यांचे योगदानही उल्लेखनीय असे आहे.
महाराष्ट्रातील शिर्डी श्री साईबाबा मंदिर (Saibaba Mandir) व आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिराकडून अनेक क्षेत्रात काम केले जात आहे. विविध असाध्य रोगांवर उपचारासाठी व गरीब, वंचितांसाठी मोफत आरोग्यसेवा पुरवण्याच्या दृष्टीने दोन्ही मंदिरांचे काम वाखाणण्याजोगे आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा देण्याच्या दृष्टीने दक्षिणेतील मंदिरे अधिक वेगाने काम करत असल्याचे दिसते. मंदिराला मिळणाऱ्या दानाच्या रकमेतही दरवर्षी वाढ होत असल्याचे तिरुपती मंदिर संस्थानच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास समोर येते.
दक्षिणेत इतर मंदिरांचे कार्य
तामिळनाडू राज्यातील मदुराईतील मीनाक्षी मंदिर ट्रस्टच्या वतीने मदुराई येथे 918 विद्यार्थिनींसाठी अनेक वर्षांपासून शाळा चालवली जाते. 34 अनाथ मुलींचा सांभाळ करणारी संस्थाही चालवली जाते. मुलींचा शैक्षणिक खर्च मंदिरातर्फे केला जातो. ऑडिव्हर ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणही देण्याचा उपक्रम राबवतात. तेलंगणातील यादगिरीगुट्टा येथील लक्ष्मी-नृसिंह स्वामी मंदिर संस्थानच्या वतीने गोशाळा चालवली जाते. हरिता प्रकल्पाच्या माध्यमातून दीड कोटी रुपये खर्चून जलपुनर्भरण कार्यक्रमावर भर देण्यात आला आहे. तिरुमलाच्या डोंगरावर जलपुनर्भरण करून 1 कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.