बारामती – देशभरात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे “अर्थचक्र’ पूर्णपणे थांबले आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रावर याचा फार मोठा परिणाम झाला आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी, कुरकुंभ, इंदापूर एमआयडीसी सुरू असली तरी देखील बारामती एमआयडीसी मात्र बंद आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती “रेड झोन’मध्ये असल्यामुळे बारामतीतील औद्योगिक क्षेत्र देखील “रेड झोन’मध्ये आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंशी निगडित काही कंपन्या वगळल्या तर संपूर्ण एमआयडीसी ठप्प आहे. त्यामुळे एमआयडीसीवर अवलंबून असणाऱ्या 30 हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तर प्रतिमहा 100 ते 150 कोटी रुपयांचे नुकसान बारामती एमआयडीसीला होत आहे.
विकासाचा पॅटर्न म्हणून बारामतीची देशाला आणि राज्याला ओळख आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच सहकार क्षेत्राबरोबर औद्योगिक क्षेत्राचा बारामतीत झपाट्याने विकास झाला आहे. बारामतीच्या एमआयडीसीमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक अशा 400 पेक्षा अधिक कंपन्यांचे जाळे निर्माण झाले आहे. या एमआयडीसीत 35 हजारांपेक्षा अधिक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. परदेशी ते स्थानिकापर्यंत रोजगार मिळाला आहे. असे असताना करोना सारख्या महामारीच्या संकटामुळे एमआयडीसी ठप्प झाली आहे.
उत्पादन थांबल्यामुळे कर्मचाऱ्यांचा रोजगार सध्यातरी गेला आहे. 30 ते 35 हजार कर्मचाऱ्यांना एमआयडीसीच्या माध्यमातून जवळपास 45 ते 50 कोटी रुपयांचे उत्पन्न प्रतिमहा मिळते. सध्य परिस्थिती मात्र वेगळी आहे. एमआयडीसीमध्ये जीवनावश्यक वस्तूंशी निगडित कंपन्या सुरू आहेत. त्यामध्ये जवळपास 2500 ते 3 हजार कामगार कार्यरत आहेत. इतर 30 हजारांपेक्षा अधिक कामगार मात्र आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
10 कोटींचे वीजबिल भरणे अनिवार्यच कंपन्या बंद असताना देखील स्थिर आकारानुसार जवळपास 10 कोटींचे वीजबिल कंपन्यांना भरावे लागणार आहे. तसेच विविध बॅंकांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जापोटी व्याजाची रक्कम कमीत कमी 15 कोटींच्यावर आहे. तसेच कंपनींना होणारा नफा 20 कोटींच्या घरात आहे. त्याच्यावर देखील पाणी पडले आहे.
बदलणाऱ्या नियमांमुळे संभ्रमावस्था बारामती एमआयडीसी सुरू होणे बाबत कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. कंपनी सुरू करण्यासाठी कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. शासनाच्या कठोर व वारंवार बदलणाऱ्या नियमांमुळे कंपन्या सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था कायम असल्याचे बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अध्यक्ष प्रमोद काकडे तसेच कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.