अल्ताफ शेख
अकोले – सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे अनुकरण करत प्रेमीयुगल सैराट होण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या चार महिन्यात अकोले तालुक्यातील 77 जण बेपत्ता झाले तर 14 अल्पवयीन मुली पळवून नेल्याच्या घटना पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
तालुक्यात मुली पळून जाण्याच्या अर्थात सैराट होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. दि. 1 जानेवारी ते 31 एप्रिलपर्यतच्या चार महिन्यात तालुक्यातील 77 जण बेपत्ता तर 14 अल्पवयीन मुली पळवून नेल्याच्या घटना दाखल झाल्या आहेत. यामध्ये अकोले पोलीस स्टेशनला 8 तर राजूर पोलीस स्टेशनला 6 तक्रारी दाखल आहेत.
अकोले पोलीस स्टेशनला 35 महिला, 15 पुरुषांसह 50 जण बेपत्ता तर 8 अल्पवयीन मुली पळवून नेल्या आहे. राजूर पोलिस स्टेशनला 15 अविवाहित, 8 विवाहित महिला व 4 पुरुषासह 27 जण बेपत्ता झाले तर 6 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. गेल्या चार महिन्यात तालुक्यातील एकूण 77 जण बेपत्ता होऊन 14 अल्पवयीन मुली पळवून नेल्याच्या घटना आहेत. यामध्ये काहीजण लग्न करून परत आल्यात तर काही बेपत्ता आहे.
एकूण गेल्या काही महिन्यांत महिला व मुली पळून जाण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. यातील अनेक घटनेत मुले-मुली या सज्ञान (वयात) असल्याने लग्न करून पोलिसांत दाखल होतात. यावेळी मुला-मुलींच्या आई- वडिल व नातेवाईकांत प्रचंड रोष असल्याने पोलीस स्टेशनलाच शाब्दिक वाद विवाद होण्याचे प्रकार होत आहे.
तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागात प्रेमाच्या आणाभाकाने अल्पवयीन मुली पळवून नेण्याच्या घटनेने पोक्सो दाखल होऊन मुलांना जेलमध्ये बसावे लागत असल्याचेही प्रकार झाले आहेत. पालकांनी सजग राहून मुलामुलींचे वैचारिक प्रबोधन करणे गरजेचे असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहे .