मुंबई: दारु पिऊन गाडी चालविणे आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाई तब्बल 138 कोटी 86 लाख 59 हजार 224 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. 2017 साली हाच दंड 85 कोटी 78 लाख 60 हजार 355 रुपये एवढा वसूल करण्यात आला होता.
वाहतूक पोलिसांना देण्यात आलेल्या ई-चलान कार्यप्रणालीमुळे वाहतूक पोलिस विभागात भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली गेली असल्याचे माहिती अधिकारात समोर येत आहे.
मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईसंदर्भात बोलायचे झाल्यास 2015 साली तब्बल 18035 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. हेच प्रमाण 2016 मध्ये वाढल्याने मद्य पिऊन गाडी चालविणाऱ्या 20768 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. 2017 मध्ये 17931 वाहनचालकांवर कारवाई झाली असून 2018 मध्ये यात सर्वाधिक घट होत 11662 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीचे नियम तोडल्यास जो दंड आकारला जोत होता त्यातही वाढ करण्यात आली. नव्या नियमांनुसार ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्यास 10,000 तर गाडी चालवताना मोबाईलचा वापर केल्यास 5 हजारांचा दंड आकारला जात आहे. तरीसुद्धा वाहनचालकांची बेदरकारपणे वाहन हाताळण्याची सवय काही गेलेली नाही.