नगर -महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मालमत्ता कराची वसुली होणे आवश्यक आहे.मालमत्ताधारकांकडून कर भरण्यास टाळाटाळ होत असल्याने थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. नोटिसा, नळ कनेक्शन तोडणे आणि जप्तीची कारवाई करूनही मालमत्ताकराची अपेक्षित वसुली होत नसल्याने अखेर महापालिकेने नगरकरांना शास्ती माफीची सवलत जाहीर केली आहे. येत्या ऑगस्ट अखेरपर्यंत थकबाकी भरल्यास 100 टक्के सवलत देण्यात आली असून मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घेऊन मालमत्ता कराची थकबाकी भरावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केली आहे.
महापालिकेची थकबाकी तब्बल 232 कोटीवर गेली आहे. ही थकबाकी भरण्यासाठी महापालिकेच्या वसुली विभागाकडून अनेक प्रयत्न झाले, मात्र या प्रयत्नांना अपयश आले. एप्रिल व मे महिन्यात मालमत्ता कर जमा करणाऱ्यांना सवलत देण्यात आली. या दोन महिन्यात नियमित मालमत्ताकर भरणाऱ्यांकडून प्रतिसाद मिळतो. मात्र थकबाकीदार याकडे पाठ फिरवित असल्याने थकबाकी कमी होण्याऐवजी ती वाढत असल्याचे दिसून आले.त्यात शास्तीमुळे या थकबाकीत मोठी वाढ होत आहे. महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न या मालमत्ताकरातून मिळते. परंतु ते अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्याचा शहरातील विकास कामांवर परिणाम झाला आहे.
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने नागरिकांनी मूलभूत सुविधा देखील महापालिकेला पुरविता येत नाही. केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून मोठी कामे होत असली तरी लहान कामांना निधी नसल्याने ती कामे आजही प्रलंबित आहे. महापालिकेची तब्बल 232 कोटींची थकबाकी असून ती वसुली होत नाही. त्यामुळे आयुक्त डॉ. जावळे यांनी शास्ती माफीचा निर्णय जाहीर केला आहे. या शास्ती माफीमुळे महापालिकेला सुमारे 132 कोटी रुपये मिळणे अपेक्षित असून मालमत्ताधारकांना तब्बल 100 कोटी रुपये सवलत मिळणार आहे.
यापुर्वी महापालिकेने शास्ती माफीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी महिनाभर ही सवलत देण्यात आली होती. त्याचा फायदा घेवून मालमत्ताधारकरांनी मालमत्ता कराची रक्कम जमा केल्याने महापालिकेची मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसुल झाली होती. त्यानुसारच आताही शास्ती माफीचा निर्णय घेण्यात आला आहे.