देऊळगावराजे – सिद्धटेक येथील ग्राम सुरक्षा समितीच्या सतर्कतेमुळे गावातील एकही व्यक्ती करोना रुग्णाच्या संपर्कात आला नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पुंड यांनी दिली. सिद्धटेक या गावात मुंबईवरून आलेल्या व्यक्तीला करोना झाल्याचे समजले आणि आता या व्यक्तीच्या संपर्कात किती लोक आले असतील याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे गावातील एकही व्यक्ती करोना बाधिताच्या संपर्कात आलेली नाही.
मुंबईवरून आलेली एक महिलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य, पोलीस व सर्वच विभाग सतर्क झाले. गाव पातळीवरील समितीची तत्परता एवढी होती की ही व्यक्ती गावामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच समितीला त्याबाबत माहिती मिळाली आणि गाडी गावात येताच शाळेत नेण्यात आली. तिथे त्या व्यक्तीचे विलगीकरण करण्यात आले. या व्यक्तीला त्रास होत असल्याचे समजताच त्वरित बारडगाव सुद्रीक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कळविण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब भोंडवे आणि आरोग्य अधिकारी डॉ. वालोकर यांनी तातडीने तपासणी केली.
त्या व्यक्तीस तातडीने रुग्णवाहिकाद्वारे नगरला पाठविण्यात आले. या सगळ्या घटनाक्रमात एकही व्यक्ती रुग्णाच्या संपर्कात आली नाही. यामध्ये सिद्धटेक ग्रामपंचायत व ग्राम सुरक्षा समितीचे, आरोग्य यंत्रणेला हा मोठा अनर्थ टाळण्यात यश आले. यासाठी सरपंच बाळासाहेब मोरे, ग्रामसेवक अमोल बरबडे, उपसरपंच रमेश पवार, पोलीस पाटील दादासाहेब भोसले, तलाठी कालीचरण मखरे आदींनी सहकार्य केले.