सातारा – लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलॉईज या कंपनीचे राजकुमार जैन यांना मारहाण करून त्यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणातून तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांची सातारा सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
सुमारे तीन वर्षांनंतर लागलेल्या या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष होते. सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर बोलवून आपणास बेदम मारहाण करत 24 लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार जैन यांनी 23 मार्च 2017 रोजी सातारा शहर पालीस ठाण्यात दिली होती.
त्यानुसार माजी खासदार उदयनराजे यांच्यासह 12 जणांवर मारहाण करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल होता. यानंतर उदयनराजे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा तसेच उच्च न्यायालयात अर्ज केले होते. तथापि, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी उदयनराजे यांनी अटक करून घेतली होती.
या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. या प्रकरणी सातारा येथील सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूकडील वकिलांनी युक्तिवाद केले. यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी माजी खासदार उदयनराजे यांच्यासह सर्व 12 जणांची निर्दोष मुक्तता केली. उदयनराजे यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केल्याचे वृत्त पसरताच साताऱ्यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.