नवी दिल्ली – मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात लोकसभा खासदार निवडणूक लढवल्यानंतर, भाजप लोकसभा निवडणुकीत राज्यसभेच्या खासदारांना उतरविण्याच्या विचारात आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि राज्यसभा खासदार सुमेरसिंग सोलंकी आणि कविता पाटीदार यांचीही संभाव्य नावे असू शकतात.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी, मार्चमध्ये मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या पाच जागा रिक्त होत आहेत. सध्या यापैकी ४ जागा भाजप आणि एक जागा काँग्रेसची आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल मार्चमध्ये होणाऱ्या राज्यसभा सदस्यांच्या निवडी ठरवतील.भाजप आणि काँग्रेसमध्ये ज्या पक्षाची विधानसभेत संख्या जास्त असेल त्याच संख्येने राज्यसभेचे सदस्य निवडून येतील. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या अपेक्षेप्रमाणे लागल्याने लोकसभा निवडणुकीत राज्यसभेच्या खासदारांना संधी मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि खासदार सुमेरसिंग सोलंकी यांचा राज्यसभेतील कार्यकाळ २०२६ पर्यंत आहे. तर कविता पाटीदार यांचा कार्यकाळ २०२८ पर्यंत राहणार आहे. अशा परिस्थितीत सिंधिया लोकसभा निवडणूक लढवणार हे निश्चित मानले जात आहे. कविता या ओबीसी महिला आणि सोळंकी हे अनुसूचित जमाती कोट्यातून प्रतिनिधित्व करणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय राज्यसभेतून निवृत्त होणारे नेतेही लोकसभा निवडणुकीसाठी आपला दावा मांडू शकतात.
मध्य प्रदेशातील ११ राज्यसभा सदस्यांपैकी ५ सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल२०२४ रोजी संपत आहे. यामध्ये भाजपचे चार सदस्य आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, एल मुरुगन राज्यसभेत मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करतात. तर अजय प्रताप सिंह आणि कैलाश सोनी यांचाही कार्यकाळ संपुष्टात येत आहे. काँग्रेसच्या एकमेव खासदार राजमणी पटेल आहेत. भाजप किंवा काँग्रेसला पाचपैकी चार जागा मिळवायच्या असतील तर त्यांना विधानसभेच्या १५० पेक्षा जास्त जागा लागतील.