नवी दिल्ली – मोदी सरकारने केवळ आपल्या श्रीमंत उद्योगपती मित्रांना लाभ देण्यासाठी देशातील लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योग क्षेत्राकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे 12 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचे अतोनात नुकसान मोदी सरकारच्या काळात झाले आहे असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. मोदी सरकारच्या अनास्थेमुळे देशातील अनेक छोटे उद्योग व व्यवसाय बंद पडले आहेत असा दावा त्यांनी केला.
गेल्या पाच वर्षात या एमएसएमई क्षेत्रामध्ये शुन्य टक्के वाढ झाली आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. त्या उलट केवळ अडीच वर्षात पंतप्रधानांच्या ‘परम मित्र’च्या संपत्तीमध्ये 13 पट वाढ झाल्याचे त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. मोदी मॅजिक म्हणजे केवळ आपल्या भांडवलदार मित्रांना मदत करणे आणि छोट्या व्यावसायिकांना देशोधडीला लावणे आहे, बाकी काही नाही असेही खर्गे यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचे सरचिटणीस, जयराम रमेश यांनीही सरकार आपल्या भांडवलदार मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी एमएसएमई क्षेत्राचे नुकसान करत असल्याचा आरोप केला. त्याचे परिणाम तुमच्या समोर आहे. बेरोजगारांची समस्या वाढली आहे आणि करोडो कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले आहे,असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.