पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- राज्यात गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीच्या विविध योजना कार्यन्वित आहेत. त्यामध्ये इयत्ता ५ वी व ८ वी मधील विद्यार्थ्यांच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती वाटप करण्यात येते. त्यासाठी १२ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात शिष्यवृत्ती या उद्दिष्टाखाली निधी वित्त विभागाने वितरीत केलेल्या १०० टक्के निधीच्या प्रमाणात शासन निर्णयान्वये निधी वितरीत करावा लागतो. अर्थसंकल्पित निधी व उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अपुरा पडत असल्याने पुरवणी मागणीबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्या प्रस्तावास नियोजन व वित्त विभागाने मान्यता दिली आहे.
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार इयत्ता ५ वीला ५०० रुपये प्रतिमहिन्याप्रमाणे १० महिन्यांसाठी ५ हजार रुपये व इयत्ता ८ वीसाठी ७५० प्रती महिन्याप्रमाणे १० महिन्यांसाठी ७ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती निश्चित करण्यात आली आहे. निधी वितरीत करण्यासाठी शिक्षण आयुक्तांना नियंत्रक अधिकारी, तसेच योजना शिक्षण संचालनालयातील लेखाधिकाऱ्यांना संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.