नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत शनिवारी रात्री तीन तासांत 11 मिमी पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरी हरियाणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची तिव्रता कमी करण्यात आल्यामुळे रविवारी सकाळपर्यंत यमुनेची पाणी पातळी 206.02 पर्यंत खाली आली होती.
यमुना नदीची वाढलेली पातळी अन् त्यात पडलेल्या पावसानंतर राजधानीतील अनेक भागात पाणी साचले होते. झाडे उन्मळून पडल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी अनेक मार्गांवर न जाण्याचा सल्ला दिल्लीकरांना दिला आहे. “एनडीआरएफ’ची अनेक पथके सध्या राजधानीत कार्यरत असून त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे.
गेल्या काही दिवसांत दिल्ली-एनसीआरमधील पूरग्रस्त भागातून 912 जनावरांसह 6345 लोकांना वाचवण्यात आले आहे. सुटका करण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये देशातील सर्वात महागडा बैल प्रीतमचाही समावेश आहे. त्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे, असेही एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसरीकडे उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासांत पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी 2 जणांचा बुडून तर 7 जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याच्या दुर्देवी घटना घडल्या आहेत.
पुराशी संबंधित अपडेट्स.
दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात.
हिमाचलमध्ये पुरामुळे घरे उद्ध्वस्त झालेल्यांना 1 लाख 45 हजारांची मदत.
श्रीखंड महादेव यात्रेच्या मार्गावरून 8 मृतदेह बाहेर काढले.
कुल्लू येथून 208 परदेशी पर्यटकांची सुटका.
उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये केदारनाथकडे जाणारा रस्ता बंद.