मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेससोबत अजित पवार यांना जायचे नव्हते. ती त्यांची भूमिका होती. पण, शरद पवारसाहेबांच्या हट्टामुळे आणि 3 दिवस समजूत घालून त्यांना परत आणले गेले.
महाविका आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद अजितदादांनी निराशेतच स्वीकारले, असे असा दावा शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
पाटील म्हणाले की, अजित पवार निधी देताना आमच्यावर अन्याय करतात, असा गुवाहाटीत गेलेल्या आमदारांचा सूर होता. त्यावेळी तो मी माध्यमांसमोर मांडला होता. त्यावेळी मी वैयक्तीक दुखणे कधीही मांडले नाही.
आता परिस्थिती बदलली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये दादा रागाने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले आहेत. अजित पवार यांना ते आवडले असते तर त्यांनी पहाटे शपथविधी कशाला घेतला असता, असा उलट सवालही त्यांनी यावेळी केला.
सांगोल्यावर अजितदादांकडून अन्याय नाही
महाविकास आघाडी सरकार असताना मी अजित पवार यांच्यावर स्पष्टपणे बोललो. पण, त्यांनी माझ्या सांगोला मतदारसंघावर कुठेही अन्याय केलेला नाही. किंबहुना त्यांनी माझ्यासाठी थोडे ढळते माप दिले.
कारण मी पूर्वी 20 ते 25 वर्षे पवारांसोबत काम केले आहे. अजित पवारांसोबत आमचा व्यक्तीगत जिव्हाळा आहे. माझ्यावर ते खवळतात, पण त्यांचे माझ्यावर प्रेम आहे, असा दावाही पाटील यांनी केला.