केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असणारे निमलष्करी दलांचे 10 हजार जवान तातडीने हटवण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे तेथील स्थिती पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत.
केंद्र सरकारने मागील वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल केला. त्यानंतर स्थिती बिघडू नये यासाठी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा वाढवण्यात आली. त्यासाठी निमलष्करी दलांचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले. नुकताच जम्मू-काश्मीरमधील स्थितीचा आणि जवानांच्या तैनातीचा आढावा केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला. त्यानंतर तेथील निमलष्करी दलांच्या 100 कंपन्या मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
एका कंपनीत सुमारे 100 जवानांचा समावेश असतो. त्या कंपन्यांना देशातील त्यांच्या मूळ तळांवर पाठवले जाणार आहे. संबंधित निर्णयानुसार चालू आठवड्यात जम्मू-काश्मिरातून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 40 कंपन्या हटवल्या जातील. त्याशिवाय, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) प्रत्येकी 20 कंपन्या परत बोलावल्या जातील. याआधी मेमध्ये 10 कंपन्या हटवण्यात आल्या होत्या.