नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील पावसामुळे 10,000 हून अधिक पर्यटक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. दुर्गम भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सरकारने 6 हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. पूरग्रस्त भागात मोबाइल नेटवर्क पूर्ववत होताच अडकलेल्यांची संख्याही वाढत आहे. तीन-चार दिवस संपर्क नसल्यामुळे अडकले लोकांच्या कुटुंबीयांच्या चिंतेत भर पडत आहे.
बचावकार्यात सर्वात मोठी अडचण लाहौल स्पितीच्या चंद्रतालमध्ये येत आहे. कारण येथे तीन फुटांपेक्षा जास्त ताजा बर्फ पडला आहे. सायंकाळचे तापमान उणे 40 अंशांपर्यंत घसरत आहे. त्यामुळे चंद्रतालपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. दोन दिवसांच्या बचावकार्यात प्रशासनाने रस्त्यावरून सुमारे 12 किमी बर्फ हटविला आहे, तर सुमारे 25 किमीचा रस्ता अद्याप साफ करणे बाकी आहे. त्यानंतरच चंद्रताल येथील सुमारे 293 पर्यटकांची सुटका करणे शक्य होणार आहे.
आत्तापर्यंत शेकडो लोकांचा बळी
उत्तराखंड, दिल्ली, यूपी, पंजाब आणि हरियाणामध्ये सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे व खराब हवामानामुळे गेल्या 4 दिवसांत देशातील विविध राज्यांमध्ये 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 8 जुलैपासून हिमाचल प्रदेशमध्ये 36, यूपीमध्ये 34, जम्मू-काश्मीरमध्ये 15, उत्तराखंडमध्ये 9, दिल्लीमध्ये 5 आणि राजस्थान, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये आनखी दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर शिमला, सिरमौर, किन्नौरमध्ये पुराचा इशारा देण्यात आला आहे. कुल्लूमध्ये बियास नदीत 30 घरे आणि 40 दुकाने असलेल्या सेंज मार्केटचा अर्धा भाग वाहून गेल्याचीह घटना घडली आहे.