आळंदी – पंढरपूर येथील आषाढी एकादशीनंतर 3 जुलैला पंढरपूरहून आळंदीकडे मार्गस्थ झालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज बुधवारी (दि. 12 जुलै) आळंदीत पोहोचला. आळंदीत पोहोचण्याआधी माऊलींची पालखी थोरल्या पादुका मंदिराजवळ आली असता या ठिकाणी पालखीचे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी दर्शन घेण्याच्या घाईत एक भाविक महिला रथाखाली जाताना पाहताच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस जवानांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून भाविक महिलेला वाचवले. मात्र यावेळी पोलीस जवान जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यातून सकाळी आळंदीकडे मार्गस्थ झाला होता. दुपारी माऊलींची पालखी थोरल्या पादुका येथे आली. यावेळी अनेक भाविक पालखीचे दर्शन घेत होते. यावेळी एक महिला घाई-घाईत दर्शन घेत असताना रथाखाली जात असल्याचे दिसली. तात्काळ पालखी बंदोबस्तासाठी तैनात असलेले दिघी पोलीस स्टेशनचे अंमलदार रविंद्र संतराम पाठे, पिंपरी चिंचवड पोलीस दलातील आरसीपी प्लाटूनचे जवान राहुल सुरेश कारंडे यांनी महिलेला रथाखाली जाण्यापासून वाचवले.
मात्र महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात रविंद्र पाठे यांच्या पायावरून पालखी रथाचे चाक गेले. या दुर्घटनेत पाठे यांचा डावा पाय फॅक्चर झाला असून जवान राहुल कारांडे जखमी झाले आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून महिलेचे प्राण वाचविल्याबाबत पोलीस जवानांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच पाठे यांचा पाय फॅक्चर झाल्याबद्दल दु:ख व्यक्त करण्यात येत असून ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे. जखमी पोलीस कर्मचारी पाठे आणि कारांडे यांच्यावर के.के. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.