गुजरातमध्ये नवरात्रीनिमित्त गरबा खेळत असताना गेल्या 24 तासांत हृदयविकाराच्या झटक्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आज पुन्हा गरबा खेळत असताना एका 17 वर्षीय युवक वीर शाहला हृदयविकाराचा झटका आला आणि रक्तस्त्राव सुरू झाला, काही वेळात त्याचा मृत्यू झाला आहे.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कपडवंज येथील गरबा मैदानावर वीर शहा नावाच्या मुलाला रक्तस्त्राव झाल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शारीरिकदृष्ट्या निरोगी 17 वर्षांच्या वीरने नवरात्रीच्या सहाव्या दिवशी गरब्यात भाग घेतला होता. त्याच्या अकस्मात निधनामुळे कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. वीरच्या मृत्यूनंतर गरबा आयोजकांनी गरबा नृत्याचा कार्यक्रम बंद केला आहे.
पालकांना वीरची माहिती मिळताच ते तात्काळ वीर जवळ पोहोचले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूनंतर वीरचे पालक रिपल शहा आणि त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. सर्व तरुणांनी गरबा खेळताना स्वतःची काळजी घ्यावी आणि खेळताना ब्रेक घ्यावा, असे आवाहन रिपाल शहा यांनी केले आहे.
गरबा खेळताना 24 तासांत 10 जणांचा मृत्यू –
गुजरातमध्ये सध्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, याच काळात गरबा खेळताना तरुणांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटनाही समोर येत असून, गेल्या 24 तासांत विविध ठिकाणी एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवरात्रीच्या 6 दिवसात 108 आपत्कालीन रुग्णवाहिकांना केवळ हृदयाशी संबंधित प्रकरणे आणि श्वासोच्छवासाच्या समस्येसाठी 521 कॉल आले आहेत. वीर शाहच्या मृत्यूपूर्वी अहमदाबादमधील 24 वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना पडून अचानक मृत्यू झाला होता. बडोद्यातील दाभोई येथे गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय गरबा खेळताना कपडवंज येथील 17 वर्षीय सगीरचाही मृत्यू झाला. बडोद्यातील एक 55 वर्षीय व्यक्ती आपल्या सोसायटीत गरबा खेळत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गरबा खेळताना दोघांचा मृत्यू झाल्याची बातमीही राजकोटमधून आली आहे.
नवरात्रीसाठी गरबा मंडपांमध्ये विशेष तयारी –
गुजरातमधील तरुणांमध्ये गेल्या काही महिन्यांत हृदयविकाराच्या झटक्याचे वाढते प्रमाण पाहता, नवरात्रीच्या काळात गरबा उत्सवादरम्यान गरबा आयोजकांकडून डॉक्टर आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारनेही सर्व सरकारी रुग्णालयांना अलर्ट जारी केला आहे. गरबा आयोजकांना कॉरिडॉर बनवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जेणेकरून रुग्णवाहिका वेळेत रुग्णालयात पोहोचू शकतील.
हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण –
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पाण्याचे कमी सेवन, मीठाचा असंतुलित वापर, रक्तदाब, झोप न लागणे आणि अनुवांशिक समस्यांमुळे हृदयविकाराची समस्या उद्भवते. गरबा खेळताना हृदयविकाराचा त्रास होऊ नये यासाठी गरबा मोकळ्या जागेत खेळावा, आयोजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण द्यावे, डाॅक्टरांनी सांगितले. गरब्याच्या ठिकाणी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी आणि हृदयविकार, मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जास्त वेळ खेळू नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.