परभणी – मराठा आरक्षणासाठी कुठे पुढाऱ्यांना गावबंदी केली जातेय, कुठे धरणे आंदोलन धरली जातात, कुठे बेमुदत उपोषण तर कुठे सभा आणि विविध आंदोलन केली जात आहेत. मात्र परभणीच्या पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगावात (Chate Pimpalgaon) ग्रामपंचायत निवडणुकीच्या एका जागेसाठी चक्क 203 महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची घटना घडली. अगोदर मराठा आरक्षण द्या (Maratha arakshan) मग निवडणूक घ्या असा नारा देत गावकऱ्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांच्या या पवित्र्यामुळे निवडणूक विभागाची चांगलीच पंचाईत होणार हे मात्र निश्चित.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिलेली आहे. जी आता संपत आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गावागावात आंदोलनाची तयारी केली जातेय. गावकऱ्यांनी पहिल्यांदा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याने काही फरक पडणार नसल्याचे लक्षात येताच गावातील सर्वच महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरवले.
त्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पूर्ण गावच वाजत गाजत पाथरी तहसील कार्यालयावर आले. यावेळी एकूण 203 महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखले केले आहेत. आता जर सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले तर ठीक अन्यथा एकही महिला आपला अर्ज मागे घेणार नाही असा निर्धार या महिलांनी केला.
शिवाय पुढच्या लोकसभा, विधानसभेसह सर्वच निवडणुकांत अशाच पद्धतीने सर्व गावकरी आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील असा इशाराही या गावकऱ्यांनी सरकारला दिला आहे.