Raj Thackeray On Pm Modi – मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपला राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यानंतर महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे सरसावले आहेत. त्यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकांदरम्यान विशेष सुचना देण्यात आल्या. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी पीएम मोदींच्या कामांचे कौतुक केले.
राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नसता, निकालानंतरही अनेक प्रलंबीत कामांप्रमाणे राम मंदिराचे काम प्रलंबीत राहिले असते. मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळातील पहिल्या पाच वर्षातील ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्याला मी विरोध केला. मात्र ज्या गोष्टी मला पटल्या, त्याबाबत मी कौतूकही केले होते. मला भूमिका बदलणे आवश्यक वाटले त्यामुळे मी भूमिका बदलली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना देखील मी काही मागितले नव्हते आणि कौतुक करतानाही मागितले नाही. जे मला आवश्यक वाटले ते मी केले, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
एका बाजूला कडगुळ आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व –
एका बाजूला कडगुळ आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व त्यामुळे मी आणि पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मोदी यांना पाठिंबा देताना महाराष्ट्रासाठी आमच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्या पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचतीलच, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यामध्ये मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा देणे, महाराष्ट्रातील गड किल्यांचे संवर्धन मादी महत्त्वाचे विषय असल्याचे म्हटले आहे.
तसेच महाराष्ट्र हे पूर्णपणे पुढारलेले राज्य आहे. उद्योग धंद्यामध्ये उद्योजकांना प्राधान्य द्यावे वाटेल, असे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. त्यामुळे मोदी यांनी सर्व राज्यांना समान पाहणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे असल्याने त्या राज्याबद्दल त्यांच्या मनात विशेष प्रेम असणे हे साहजिक आहे. मात्र महाराष्ट्राकडे देखील तेवढ्याच तळमळीने लक्ष देणे आवश्यक असल्याची अपेक्षा, राज ठाकरे यांनी व्यक्त केली.